नबीन यांच्या निर्णयात महाराष्ट्राचा मोठा प्रभाव; राज्यातील तीन भाजप नेत्यांना मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:12 IST2026-01-22T13:09:29+5:302026-01-22T13:12:08+5:30
राम माधव यांचे सक्रिय राजकारणात पुनरागमन

नबीन यांच्या निर्णयात महाराष्ट्राचा मोठा प्रभाव; राज्यातील तीन भाजप नेत्यांना मोठी जबाबदारी
हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भाजप अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांच्या पहिल्याच निर्णयात राजकीय पटलावर महाराष्ट्राचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी व इतर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत, तर महाराष्ट्रातील इतर दोन नेत्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन प्रमुख स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे आमदार संजय उपाध्याय यांची बंगळुरू महानगरपालिका निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय उपाध्याय हे भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांच्या नेतृत्वाखाली काम करतील. महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांची तेलंगणा स्थानिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नबीन यांच्या पहिल्याच निर्णयामुळे भविष्यात काय अपेक्षित आहे, याची झलक मिळते.
राम माधव यांचे सक्रिय राजकारणात पुनरागमन
राम माधव यांना २०२० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात परत पाठविण्यात आले होते. २०२४ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केल्यावर सक्रिय राजकारणात त्यांच्या पुनरागमनाचे मोठे संकेत मिळाले. नितीन नबीन यांच्या टीममध्ये राम माधव यांना महत्त्वाचे स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तावडे चंडीगडला रवाना
चंडीगड महापौर पदाच्या खुर्चीवर भाजपचा उमेदवार बसविण्यासाठी भाजप नेते विनोद तावडे आज तडकाफडकी चंडीगडला रवाना झाले. तावडे यांची चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी दिवसाढवळ्या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदानपत्रात हेराफेरी केली होती. यानंतर हे प्रकरण खूप गाजले आणि सर्वोच्च न्यायालयात गेले. २९ जानेवारीला महापौर, ज्येष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे.