मध्ये प्रदेशच्या मेहरमध्ये मोठा अनर्थ टळला, रोपवेमध्ये अडकले 80 भाविक; असा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 20:52 IST2022-05-23T20:52:45+5:302022-05-23T20:52:58+5:30
मध्य प्रदेशातील शारदा देवी मंदिरात 28 रोपवे ट्रॉली हवेत असताना वादळात अडकल्याची घटना घडली आहे.

मध्ये प्रदेशच्या मेहरमध्ये मोठा अनर्थ टळला, रोपवेमध्ये अडकले 80 भाविक; असा वाचला जीव
मेहर: मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम उत्तर आणि मध्य भारतात दिसू लागला आहे. हवामानात बदल होऊन वादळ आणि पावसाची सुरुवात झालीय. दरम्यान सोमवारी मेहर येथील माता शारदेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा जीव धोक्यात आल्याची घटना घटली. शारदा मंदिराचा रोपवे हवेत असताना वीजपुरवठा खंडित झाला, यादरम्यान वादळही आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा हवेत असलेल्या 28 ट्रॉलींमध्ये सुमारे 80 भाविक अडकले होते. वादळ आणि पावसामुळे दुपारी तीन वाजेच्या सुमारास विज पुरवठा खंडित झाला आणि ट्रॉली बंद पडल्या. सूमारे दोन तास जीव मुठीत घेऊन हे भाविक हवेत लटकत होते. सायंकाळी 5 वाजता या सर्वांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मेहरचे तहसीलदार मानवेंद्र सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सतना शहरात आज जोरदार वारा आणि अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दामोदर रोपवे व्यवस्थापनाने हळू-हळू ट्रॉली खाली आणल्या आणि भाविकांना खाली उतरवले. या घटनेने झारखंडमधील देवघर येथे नुकत्याच झालेल्या रोपवे अपघाताची आठवण करून दिली.
झारखंमध्ये काय घडलं?
गेल्या महिन्यात झारखंडच्या त्रिकूटमध्ये रोपवे अपघात झाला होता. 48 लोक 20 तासांपेक्षा जास्त काळ हवेत अडकले होते. देवघर रोपवेवर दोन ट्रॉली एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला होता. यात काही लोकांचा मृत्यू झाला. रामनवमीला येथे शेकडो पर्यटक पूजा करण्यासाठी दाखल झाले होते. बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराची मदत घेण्यात आली होती.