Lumpy Skin Disease : लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 14:57 IST2022-09-13T14:51:33+5:302022-09-13T14:57:56+5:30
Lumpy Skin Disease : सरकारी आकडे 45 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देत असतील, पण प्रत्यक्षात मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

Lumpy Skin Disease : लम्पी त्वचारोगाचा धसका! लाखो गायींना लागण; लोकांनी भीतीपोटी दूध पिणं केलं बंद
देशभरात लम्पी त्वचारोगाचा कहर पाहायला मिळत आहे. गायींच्या मृत्यूमुळे ग्रामीण भागात हळहळ व्यक्त होत आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 45 हजार गायींचा लम्पी संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या तब्बल 10 लाख 36 हजार गायींना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सरकारी आकडे 45 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देत असतील, पण प्रत्यक्षात मृतांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.
पश्चिम राजस्थानला बसला सर्वाधिक फटका
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये आतापर्यंत 45 हजार 63 गायींचा लम्पी संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर 10 लाख 36 हजार गायींना याची लागण झाली असून 99 हजार गायींवर उपचार सुरू आहेत. मात्र आतापर्यंत 5 लाख 71 हजार गायी उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री लालचंद कटारिया यांच्या म्हणण्यानुसार, या संसर्गाचा प्रादुर्भाव पश्चिम राजस्थानमध्ये अधिक आहे.
लम्पीमुळे गायींच्या मृत्यूवरून विरोधकांनी सरकारला घेरलं
सर्वात भयावह बाब म्हणजे मृत गायी उघड्यावर फेकल्या जात आहेत. बिकानेर आणि बारमेरमध्ये हजारो मृत गायी उघड्यावर पडलेल्या आढळल्या आहेत. कालांतराने गायींचे मृतदेह कुजत असून, त्यातून भयानक दुर्गंधी येत आहे, त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. मृत गायींचे फोटो समोर आल्यानंतर आता विरोधकही गोवंशाचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आहेत. लम्पीमुळे गायींच्या मृत्यूवरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.
लोकांनी दूध पिणं केलं बंद
राजस्थान सरकारने अद्याप लम्पीला महामारी घोषित केलेले नाही, राज्य सरकार केंद्राला महामारी घोषित करण्यासाठी पत्र लिहित आहे. रोगराई पसरण्याच्या भीतीने गावातील लोकांनी दूध पिणे बंद केले आहे. त्याचबरोबर शहरातील डेअरींमध्ये दूध आणि तुपाच्या पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. हा आजार रोखणे हे राजस्थान सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.