LPG टंचाईच्या मुद्द्यावरून खर्गेंची सरकारवर टीका; नड्डा म्हणाले- हे संकट भारतामुळे निर्माण झालेले नाही.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:04 IST2026-03-16T13:04:11+5:302026-03-16T13:04:37+5:30
LPG टंचाईच्या मुद्द्यावर राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ; केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

LPG टंचाईच्या मुद्द्यावरून खर्गेंची सरकारवर टीका; नड्डा म्हणाले- हे संकट भारतामुळे निर्माण झालेले नाही.
नवी दिल्ली: भारतातील LPG तुडवड्याच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, विरोधकांनी केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित करत या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना मध्येच थांबवत सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
काँग्रेसवर लोकांना भडकावण्याचा आरोप
नड्डा म्हणाले की, अडचणीच्या काळातही काँग्रेस राजकारण करण्यापासून मागे हटत नाही. सध्या निर्माण झालेली परिस्थिती भारतामुळे नाही, तर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे उद्भवली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे. नड्डा यांनी काँग्रेसवर लोकांना भडकावण्याचा आरोपही केला. ते म्हणाले की, काँग्रेसचा एक नेता सिलेंडर साठवणूक करताना पकडला गेला. अशा प्रकारे सिलेंडरची होर्डिंग करून ते जनतेला भडकवण्याचे काम करत आहेत. अशा परिस्थितीतही ते राजकारण करणे थांबवत नाहीत, अशी टीका नड्डांनी केली.
एलपीजी आणि इंधन पुरवठा सुरक्षित
दरम्यान, केंद्र सरकारने देशात एलपीजी किंवा इंधनाची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा केला आहे. सरकारच्या माहितीनुसार, देशात घरगुती एलपीजी रिफिल बुकिंगमध्ये अलीकडे घट झाली असून, ती सध्या सुमारे ७७ लाखांवर आली आहे. १३ मार्च रोजी हा आकडा ८८.८ लाख होता. पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने स्पष्ट केले की, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि देशात कोणत्याही प्रकारची कमतरता निर्माण होणार नाही.
अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणावपूर्ण स्थिती असून, त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज या महत्त्वाच्या समुद्री मार्गावर निर्बंध लावले होते. या मार्गावरून भारतासह अनेक देशांची तेलवाहतूक होते. मात्र, इराणने अलीकडेच भारतीय जहाजांना मार्ग मोकळा करून दिला असून, ही जहाजे भारतात येत आहेत.