LPG Cylinder Crisis:इराणचे इस्रायल आणि अमेरिकेसोबत युद्ध सुरू झाल्यामुळे भारतात कमर्शियल LPG गॅसची टंचाई निर्माण झाल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि अनेक उद्योगांवर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी या परिस्थितीसाठी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला जबाबदार धरले आहे.
देश गंभीर संकटातून जात आहे
दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले, सध्या देश अतिशय गंभीर संकटातून जात आहे. संपूर्ण देशात LPG गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. देशातील दैनंदिन उत्पादन केवळ ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित झाले आहे. भारतातील LPG च्या एकूण वापरापैकी सुमारे ६० टक्के आयात केली जाते. त्यातील जवळपास ९० टक्के पुरवठा होर्मुज सामुद्रधुनीतून येतो. हा मार्ग सध्या बंद झाल्यामुळे देशात केवळ ५० ते ५५ टक्के LPG उपलब्ध आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर मोठा परिणाम
केजरीवाल यांच्या मते, LPG टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसत आहे. त्यांनी सांगितले की, सरकारने रेस्टॉरंट आणि हॉटेलांना LPG पुरवठ्यावर मर्यादा घालणारे आदेश दिले आहेत. सुरक्षा कारणास्तव या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवून ठेवण्याची परवानगी नसते आणि त्यांना रोजच्या रोज सिलेंडर पुरवले जातात.
अचानक पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होऊ लागले आहेत. मुंबईमध्ये सुमारे २० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद झाल्याचा दावा करण्यात आला असून, पुढील काही दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. तमिळनाडूमध्येही सुमारे १० हजार हॉटेल बंद होण्याच्या स्थितीत आहेत. पंजाब, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, हरियाणा आणि बिहारमधूनही अशाच प्रकारच्या तक्रारी येत असल्याचा दावा त्यांनी केला.
लाखो लोक बेरोजगार होण्याची शक्यता
गुजरातमधील मोरबी येथील टाइल उद्योगाचे उदाहरण देत सांगितले की, तेथे ६५० उद्योगांपैकी सुमारे १७० उद्योग बंद झाले असून, जवळपास एक लाख लोक बेरोजगार झाले आहेत. देशभरातही १ कोटींपेक्षा जास्त लोक अचानक बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा दावाही अरविंद केजरीवाल यांनी केला.
मोदी सरकारच्या धोरणावर टीका
केंद्र सरकारवर टीका करताना केजरीवाल म्हणाले की, भारताने कोणत्याही युद्धात तटस्थ भूमिका घ्यायला हवी होती. गेल्या ७५ वर्षांपासून भारताची परराष्ट्र नीती तटस्थ राहण्याची होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांतच ती मोडीत काढली. भारताने थेट इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने उभे राहणे ही मोठी चूक होती. युद्ध सुरू होण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधानांनी इस्रायलला भेट देण्याची गरज काय होती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Web Summary : Arvind Kejriwal blames Modi's foreign policy for LPG shortages, impacting businesses. Hotel closures rise, potentially causing mass unemployment exceeding one crore. Kejriwal stresses India's neutrality traditionally.
Web Summary : अरविंद केजरीवाल ने एलपीजी की कमी के लिए मोदी की विदेश नीति को दोषी ठहराया, जिससे व्यवसायों पर असर पड़ा। होटल बंद होने से बड़े पैमाने पर बेरोजगारी हो सकती है, जो एक करोड़ से अधिक है। केजरीवाल ने भारत की तटस्थता पर जोर दिया।