Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:34 IST2025-06-14T17:33:01+5:302025-06-14T17:34:36+5:30
Ahmedabad Plane Crash : आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर वडील भारतात आले होते. पण आता विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने ८ आणि ४ वर्षांच्या दोन्ही मुलींना मोठा धक्का बसला आहे.

Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक अहमदाबादमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असून त्याचा आक्रोश हेलावून टाकत आहे. याच दरम्यान मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
कॅन्सरने आईला हिरावून नेलं आणि आता विमान अपघातामुळे चिमुकल्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ झाल्या आहेत. २६ मे रोजी मुलींच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर वडील भारतात आले होते. पण आता विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने ८ आणि ४ वर्षांच्या दोन्ही मुलींना मोठा धक्का बसला आहे. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत त्यांना दुसरा धक्का बसला आहे.
शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले
अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात अर्जुन पटोलिया यांचा मृत्यू झाला. ३७ वर्षीय अर्जुन आपल्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. पत्नी भारतीची तिच्या मृत्यूनंतरचे विधी गुजरातमध्ये करावेत अशी इच्छा होती. त्यामुळे अर्जुन यांनी वडोदऱ्यापासून ६० किमी अंतरावर असलेल्या पोईचा येथील नीलकंठधाम आणि अमरेली जिल्ह्यातील वाडिया या त्याच्या मूळ गावी नर्मदा नदीत तिच्या अस्थींचं विसर्जन केलं.
"तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
अर्जुन लंडनला परतत असताना नशिबाने त्याला आणखी एक क्रूर धक्का दिला. अर्जुनची आई सुरतमध्ये राहते. अर्जुनचा चुलत भाऊ संजय म्हणाला, "माझी वहिणी भारतीची इच्छा होती की, तिचं अस्थीविसर्जन भारतात व्हावं, म्हणून अर्जुन भारतात आला होता. कधीच कल्पना केली नव्हती की काही दिवसांत अर्जुनवरही अंत्यसंस्कार करावे लागतील."
हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
अर्जुन २० वर्षांचा असताना युकेला गेला. तो गेल्या १७ वर्षांपासून लंडनमध्ये राहत होता. तिथे तो फर्निचरचं दुकान चालवत होता. तिथेच त्याचं लग्न झालं आणि त्यांना दोन मुली आहेत. भारती मूळची कच्छ जिल्ह्यातील होती आणि कुटुंब आता अहमदाबादमध्ये स्थायिक झाले आहे. अर्जुनचा धाकटा भाऊ गोपाळ हा सध्या लंडनमध्ये आहे. तो आता दोन्ही मुलींची काळजी घेत आहे.