५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 20:10 IST2025-06-17T20:07:09+5:302025-06-17T20:10:11+5:30
Air India Flight Cancelled History: मंगळवारी एकाच दिवसांत एअर इंडियाने तांत्रिक कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
Air India Flight Cancelled History: १२ जून २०२५ रोजी दुपारी सुमारे दीड वाजता अहमदाबाद ते लंडन या दरम्यान जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यावर अवघ्या ४० ते ५० सेकंदात विमान कोसळले आणि त्या विमानात प्रवास करत असलेल्या २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु, एक व्यक्ती अतिशय आश्चर्यकारकपणे या भीषण विमान अपघातातून थोडक्यात बचावली. या घटनेमुळे संपूर्ण भारतवासीयांचे मन अतिशय सुन्न झाले. जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. परंतु, यानंतरही एअर इंडियाचा गोंधळ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत तांत्रिकसह अन्य कारणांमुळे एअर इंडियाला शेकडो विमाने रद्द करावी लागली आहेत.
अहमदाबाद अपघातानंतर बोईंग ड्रीमलायनरबाबत एअर इंडियाने सावध पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी एकाच दिवसांत एअर इंडियाची तब्बल ७ विमाने रद्द करण्यात आली. तांत्रिक गोंधळाबरोबरच खराब हवामानाचाही फटका एअर इंडियाच्या सेवेला बसला आहे. मंगळवारी दिवसभरात विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांना रद्द करण्यात आले. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले. तसेच अमृतसरहून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले. दिल्लीहून पॅरिसला जाणारे विमानही एअर इंडियाने रद्द केले. एकाच दिवसांत एअर इंडियाची सात उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यापैकी सहा विमाने ही बोईंग ड्रीमलायनरशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यसभेत सरकारने दिलेल्या उत्तरात २०२२ ते २०२४ पर्यंतच्या वेगवेगळ्या उड्डाणे रद्द केल्याची आकडेवारी देण्यात आली होती. या आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२२ मध्ये एअर इंडियाच्या ८७ हजार १९१ पैकी १२२ उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली. सन २०२३ मध्ये १ लाख ०५ हजार ९९९ पैकी १८१ उड्डाणे तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली होती. २०२४ मध्ये एअर इंडियाच्या कामगिरीत काहीशी सुधारणा झालेली पाहायला मिळाली. एकूण १ लाख १० हजार ३५१ उड्डाणांपैकी १०७ उड्डाणे त्या वर्षांत तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, आताच्या घडीला एअर इंडियाच्या विदेशातून भारतात येणाऱ्या विमान सेवेवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. एअर इंडियाच्या वतीने विमाने रद्द होत असल्याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.