नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या अनोख्या शैलीत एक खास ट्विट केलं आहे. शेतकरी आंदोलन आणि एकंदर परिस्थितीवर शेरोशायरीच्या अंदाजात नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाष्य केलं आहे. "श्रीमंताच्या घरातील कावळाही मोर दिसतो" असं ट्विटमध्ये म्हटलं असून त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास ट्विट केलं आहे. "श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?" असा थेट सवाल सिद्धू यांनी केला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच प्रत्येक जण सिद्धू यांच्या ट्विटचा अर्थ आपआपल्या मतांनुसार लावत आहे आणि त्याची प्रशंसा किंवा टीका करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धू यांनी याआधी देखील अनेकदा कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली.
"जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो"
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांचा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. "जर तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जिंकलेलं नाही हेच इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे" असं सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन शिवसेनेने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार नाही असा 'शब्द' केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर 'कृषी उपकर' लावल्यानंतर दिला होता. पण नेहमीप्रमाणे हादेखील 'शब्दाचा बुडबुडा'च ठरला" असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच "सरकार आता आंतरराष्ट्रीय बाजाराकडे बोट दाखवून स्वतःचा बचाव करीलही; पण घरगुती गॅसच्या मोठय़ा दरवाढीचे काय? त्यावर 'आम्ही ही दरवाढ होणार नाही असा शब्दच कुठे दिला होता?' अशी मखलाशी सत्तापक्ष करू शकतो. विद्यमान सत्ताधाऱ्यांची ही शब्दांची 'जुमलेबाजी' देशाला नवीन नाही. तीन कृषी कायद्यांच्या नावाने शेतकऱ्यांशी अशीच जुमलेबाजी सुरू आहे. आता इंधन-गॅस दरवाढीवरून सामान्य जनतेबाबतही तेच होईल" अशा शब्दांत टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.