Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 09:23 AM2021-07-26T09:23:20+5:302021-07-26T09:26:23+5:30

Kargil Vijay Diwas : कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २२ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेले दुसरे युद्धही भारताने जिंकले होते. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे.

Kargil Vijay Diwas what is history and reason behind kargil war know details | Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्ध का झालं? जाणून घ्या, इतिहास अन् कारणं... 

googlenewsNext
ठळक मुद्देकारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २२ वर्षे पूर्ण होत आहेत.दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांमधील छत्तीसचा आकडा जगाला माहीत आहे. भारतानेपाकिस्तानला 'टाळी' देण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचे कांगावे आणि कुरापतींमुळे ही मैत्री होऊ शकलेली नाही. उलट, काश्मीरवर पाकिस्तानने हक्क दाखविला आणि नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया केल्या, यामुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला पुन्हा एकदा कारगिलसारखा दणका द्यायला हवा', अशी इच्छा अनेक जण व्यक्त करतात. त्याच अनुषंगाने, कारगिल विजय दिवसाच्या (२६ जुलै) निमित्ताने या युद्धाचा इतिहास आणि कारणे जाणून घेऊ या...

भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेले दुसरे युद्धही भारताने जिंकले होते. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. उलट, हे पराभव त्यांच्या इतके जिव्हारी लागलेत की, भारताला अस्थिर करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी त्यांचे सगळे कट उधळून लावले. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'. 

अणुचाचणीच्या मुद्द्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा करून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचं निश्चित करण्यात आले होते. परंतु, 'हम नही सुधरेंगे' वृत्तीच्या पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या. लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या जवानांना लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केली. हेच होतं, 'ऑपरेशन बद्र'. 

काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचे कारस्थान त्यांनी रचले होते. कारण, या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असे पाकिस्तान समजत होता. सुरुवातीला ही घुसखोरी भासवण्यात आली. पण, भारतीय जवान डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नियंत्रण रेषेवर शोधमोहीमेदरम्यान पाकिस्तानचा कट उघड झाला. मोठा हल्ला करण्याच्या तयारीने पाकने आपल्या जवानांनाच LoC पार पाठवले असल्याचे बिंग फुटले आणि भारताचे तब्बल २ लाख जवान 'ऑपरेशन विजय' यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले. तब्बल ६० दिवस ते जिद्दीने लढले आणि जिंकले.

कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून १३ ते १८ हजार फूट उंचीवर आहे. तेथील तापमान उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सियस इतके असते. अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते. इतक्या उंचीवर कधीच कुठलंच युद्ध झाले नव्हते. या युद्धात २६ जुलै १९९९ च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानाने तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. 

Web Title: Kargil Vijay Diwas what is history and reason behind kargil war know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.