"त्यांनी पहिली गोळी शुभमला मारली अन्...";तरुणाच्या पत्नीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:00 IST2025-04-24T18:52:49+5:302025-04-24T19:00:27+5:30
पहलगाम हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदी नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

"त्यांनी पहिली गोळी शुभमला मारली अन्...";तरुणाच्या पत्नीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्यात दहशतावाद्यांनी निष्पाप पर्यटकांची निर्घृणपणे हत्या केली. या क्रूर हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांनाच लक्ष्य केले आणि त्यांच्या कुटुंबियांसमोरच त्यांना गोळ्या घालून संपवले. अनेकजण आपल्या कुटुंबासोबत बैसरन व्हॅलीमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला करत नसरंसहार सुरु केला. या हल्ल्यात उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील शुभम द्विवेदी नावाच्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी सर्वात आधी शुभमवर गोळीबार केला आणि मग इतरांवर हल्ला केल्याची माहिती त्याच्या पत्नीने दिली.
दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या हत्येनंतर कानपूरवर शोककळा पसरली आहे. बुधवारी रात्री २ वाजता शुभमचे पार्थिव त्याच्या गावी पोहोचले. मध्यरात्री, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मोठ्या संख्येने गावकरी शुभमच्या मृतदेहाची वाट पाहत होते. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू आला तेव्हा द्विवेदी कुटुंबियांनी आक्रोश सुरु केला. यावेळी शुभमची पत्नी एशान्याने तिथे नेमकं काय घडलं हे सर्वांना सांगितले. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
"आम्ही तिथे हसत आणि आनंदात बसलो होतो. तो आला आणि धर्माबद्दल विचारू लागला आणि नंतर त्याला गोळी मारली, असे एशान्याने सांगितले. आम्ही तिथे हसत, गप्पागोष्टी करत बसलो होतो. दहशतवादी आले आणि शुभमवर बंदूक रोखत त्याला विचारले की तू हिंदू आहेस की मुस्लिम? जर तू मुस्लिम आहेस तर कलमा बोलून दाखव. सुरुवातीला आम्हाला काहीच समजले नाही. मग त्यांनी पुन्हा विचारले की तू हिंदू आहे की मुस्लिम? जेव्हा त्याने हिंदू असल्याचे उत्तर दिले तेव्हा त्यांनी लगेच शुभमवर गोळ्या चालवल्या. दहशतवादी सगळ्यात आधी आमच्याकडे आले. त्यांनी पहिली गोळी शुभमला मारली आणि नंतर लोकांवर गोळीबार सुरू केला," असे एशान्या म्हणाली.
"दहशतवाद्यांनी एशान्याला मारले नाही. आम्ही काय केले आहे ते सरकारला जाऊन सांग, असे दहशतवाद्यांनी एशान्याला सांगितले. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि ते पहलगामला फिरण्यासाठी गेले होते. त्या दोघांनी घोडेस्वारी करण्याचा निर्णय घेतला. तर कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या हॉटेलजवळच थांबले होते. यादरम्यान, दोन-तीन दहशतवादी शुभम आणि त्याच्या एशान्याजवळ आले. शुभमला त्याची ओळख विचारल्यानंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. यामुळे त्याचा मृत्यू झाला," असे त्याच्या काकाने सांगितले.