Assembly Elections 2022: '4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:08 IST2022-02-25T15:07:47+5:302022-02-25T15:08:51+5:30
Assembly Elections 2022: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत, यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत.

Assembly Elections 2022: '4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा
नवी दिल्ली: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांनी दावा केला आहे की, भाजप पाचपैकी चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. त्यांच्या मते, सध्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे सत्ताविरोधी घटक नाही.
न्यूज18इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा म्हणतात की, चार राज्यांमध्ये लाट आमच्या बाजूने आहे. उत्तर प्रदेशात तर भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल. गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले असून, यूपीमध्ये चार फेऱ्यांचे मतदान झाले आहे. तर मणिपूरमध्ये दोन्ही टप्प्यात निवडणूक होणे बाकी आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.
आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात
नड्डा पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालप्रमाणे उत्तर प्रदेशात निकाल येणार नाहीत. भाजपने बंगालमध्ये पक्ष मजबूत केला, पण उत्तर प्रदेशात आधीच पक्ष मजबूत आहे. बंगालमध्ये पक्ष 3 वरुन 77 जागांवर पोहोचल्या, हीदेखील मोठे यश आहे. मुस्लिमांना भाजपची भीती का वाटते, असे विचारले असता नड्डा म्हणाले, आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत. सर्वांचा विकास हेच आमचे ध्येय आहे. जन धन, सौभाग्य आणि उज्ज्वला सर्वांसाठी समान आहेत.
अखिलेशवर निशाणा
जेपी नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश तुष्टीकरणाचे राजकारण करतात. अखिलेश यादव यांची राजकीय समज मर्यादित आहे. त्यांचा दहशतवाद्यांना वाचवण्याचा इतिहास आहे. अखिलेश यांनी बॉम्बस्फोटांचे आरोपी मोकळे केले. सायकलवर मतदान म्हणजे दहशतवाद्यांच्या समर्थकाला मत. समाजवादी पक्षाने नेहमीच संधीसाधू युती केली.
अखिलेशच्या राजवटीत दंगली झाल्या
नड्डा म्हणाले की, योगी आदित्यनाथ जे काही बोलले ते खरे आहे. अखिलेश सरकारच्या काळात 200 दंगली झाल्या. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आमचा विश्वास आहे. भाजपला मुस्लिमांचाही पाठिंबा मिळेल. व्होट बँकेचे राजकारण हे विरोधकांचे काम आहे, असे ते म्हणाले. तसेच, नड्डा यांनी प्रियांका गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले लोक गंभीर नसतात, असा टोलाही लगावला.