अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:54 IST2025-08-24T12:53:15+5:302025-08-24T12:54:02+5:30
हत्तीच्या हल्ल्यात एका गावकऱ्याचा मृत्यू झाला, त्यानंतर भरपाईबाबत मोठा वाद निर्माण झाला.

फोटो - आजतक
छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्तीच्या हल्ल्यात एका गावकऱ्याचा मृत्यू झाला, त्यानंतर भरपाईबाबत मोठा वाद निर्माण झाला. सरकारने मृताच्या कुटुंबाला ६ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली, परंतु ही रक्कम मिळवण्यासाठी सहा महिलांनी त्या मृताची पत्नी असल्याचा दावा केला.
जशपूर जिल्ह्यातील पत्थलगाव वनपरिक्षेत्रातील बालाझार चिमटापाणी गावात ही घटना घडली आहे. २६ जुलै रोजी गावकरी सालिक राम टोप्पो जंगलाकडे जात असताना एका हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर सरकारने ६ लाख रुपयांची भरपाई रक्कम जाहीर केली. परंतु या घोषणेनंतर समोर आलेला वाद संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनला.
६ महिलांनी केला पत्नी असल्याचा दावा
सुगंधी बाई, बुधियारो बाई, संगीता बाई, शिला बाई, अनिता बाई आणि मीना बाई - या सहा महिलांनी स्वतःला सालिक रामची पत्नी असल्याचं सांगून भरपाईचा दावा केला. यापैकी दोघींनी पंचायतीने दिलेले प्रमाणपत्रही सादर केलं आहे, तर उर्वरित महिला युक्तिवाद करत आहेत. मृताचा मुलगा भागवत टोप्पो आणि त्याची सावत्र आई बुधियारो बाई म्हणतात की, ते खरे वारस आहेत, कारण ते सालिक रामच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्यासोबत होते. दुसरीकडे इतर महिला देखील त्यांच्या संबंधित नातेसंबंधांच्या कथा आणि पुरावे सादर करत आहेत.
खरी दावेदार कोण?
या प्रकरणावर रेंजर कृपासिंधू पंक्रा म्हणाले की, सहा महिलांनी आमच्याकडे दावे सादर केले आहेत, परंतु आम्ही फक्त सालिक राम राहत असलेल्या त्याच पंचायतीने दिलेले प्रमाणपत्र ओळखू. त्याच वेळी, ग्रामपंचायत बालाझरचे सरपंच हरिनाथ दिवाण म्हणाले की, पंचायतीने सालिकची खरी पत्नी बुधियारो बाई आणि मुलगा भागवत टोप्पो यांच्या नावाने पंचनामा तयार केला आहे आणि तो वन विभागाला पाठवला आहे, परंतु आता इतर महिला देखील दावे करत आहेत.
"मी २० वर्षे त्यांच्यासोबत राहत होते"
मृताचा मुलगा भागवत टोप्पो म्हणाला की, माझी आई सुगंधीबाई मला लहानपणीच सोडून गेली. तेव्हापासून मी माझे वडील आणि सावत्र आई बुधियारो बाई यांच्यासोबत राहत होते. त्यामुळे मी आणि माझी आई या भरपाईचे खरे दावेदार आहोत. पत्नी बुधियारो बाई म्हणते की, मी २० वर्षे त्यांच्यासोबत राहत होते आणि त्यांच्या मृत्यूच्या वेळीही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे या भरपाईवर माझा हक्क आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, खरी पत्नी कोण आहे आणि कोणाला भरपाई मिळेल याबद्दल ग्रामस्थही गोंधळलेले आहेत.