हैदराबादमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शोभायात्रेवेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटून मोठी दुर्घटना घडली आहे. रथ तारांना चिकटल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या एका सुरक्षारक्षकाचाही समावेश आहे.
ही दुर्घटना हैदराबादमधील रामंतापूर येथील गोपालनहर परिसरात रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतयांमध्ये श्रीकृष्ण (२१), श्रीकांत रेड्डी (३५), सुरेश (३४), रुद्र विकास (३९) आणि राजेंद्र रेड्डी (४५) यांचा समावेश आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना शोक अनावर झाला. दरम्यान, पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचा सुरक्षा रक्षकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेमुळे जन्माष्टमीच्या आनंदाला गालबोट लागले आहे.