श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यानं भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. मी भारतीय लष्करामुळेच जिवंत असल्याची कबुली लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी एजाज अहमद गुजरीनं दिली आहे. जवानांवर गोळीबार केल्यानंतरही प्रत्युत्तरा दाखल त्यांनी माझ्यावर गोळीबार केला नाही. भारतीय जवान मला ठार करू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. अशा पद्धतीनं या दहशतवाद्यानं पाकिस्तानचं कु-कृत्यू जगासमोर आणले आहे. शिवाय, आपल्या साथीदारांना दहशतवादाचा मार्ग सोडण्याचं आवाहनही या दहशतवाद्यानं केले आहे.
सुरक्षा दलानं एजाजला त्याच्या दोन साथीदारांसहीत बारामुल्ला परिसरातून अटक केली होती. बुधवारी (9 मे) श्रीनगरमध्ये या दहशतवाद्याला प्रसिद्धी माध्यमांसमोर आणण्यात आले. यावेळीच एजानं सांगितलं की, भारतीय लष्करामुळे मी जिवंत आहे. चकमकीदरम्यान जवानांनी गोळीबार थांबवला होता. ते मला ठारदेखील करू शकले असते, मात्र त्यांनी तसं केले नाही.
''माझ्या अन्य साथीदारांनीही दहशतवादाचा मार्ग सोडावा. आम्ही 6 महिन्यांपासून जंगलात राहत होतो. ज्यादिवशी आमचा भारतीय सैन्यासोबत सामना झाला तेव्हा त्यांनी आम्हाला अटक केले. त्यांनी मला नवीन आयुष्य दिलं'', असे सांगत एजाजनं भारतीय लष्कराचे आभार मानलेत.