जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 19:55 IST2025-12-27T19:55:10+5:302025-12-27T19:55:40+5:30
Jammu Kashmir Indian Army Fight against Terrorism: दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ही शोध मोहीम सातत्याने राबवली जात आहे.

जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
Jammu Kashmir Indian Army Fight against Terrorism: जम्मू काश्मीरच्या चिल्लई कलान भागातील हिवाळा आणि मुसळधार बर्फवृष्टी दरम्यान भारतीय सैन्याने किश्तवाड आणि दोडा जिल्ह्यांमध्ये दहशतवादविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हिवाळी हवामान आणि कठीण भूभाग असूनही, पाकिस्तान समर्थित दहशतवादी या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याने त्यांना सुरक्षित आश्रयस्थान मिळू नये म्हणून लष्कराने उंच आणि बर्फाच्छादित भागात आपली गस्त वाढवली आहे. हिवाळ्यात सहसा दहशतवादी कारवायांमध्ये घट होते, परंतु यावेळी लष्कराने आपली रणनीती बदलली आहे आणि थंड हवामानातही आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. लष्कराने उंचावरच्या भागात तात्पुरत्या चौक्या आणि नजर ठेवण्यासाठी सेंटर्स स्थापन केली आहेत. कडाक्याच्या थंडीचा फायदा घेऊन लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ही शोध मोहीम सातत्याने राबवली जात आहे.
३०-३५ पाकिस्तानी दहशतवादी लपल्याचा संशय
सूत्रांनुसार, जम्मू प्रदेशात अंदाजे ३० ते ३५ पाकिस्तानी दहशतवादी लपल्याचा संशय आहे. सततच्या दबावामुळे या दहशतवाद्यांना आता लोकवस्तीच्या क्षेत्रांपासून दूर उंचावर आणि एकाकी भागात आश्रय घ्यावा लागत आहे. काही दहशतवादी स्थानिकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना आता पूर्वीसारखा स्थानिक पाठिंबा मिळताना दिसत नाही असे वृत्त आहे. या हिवाळी कारवाईत, जम्मू आणि काश्मीर पोलिस, सीआरपीएफ, एसओजी, वन विभाग आणि ग्राम संरक्षण रक्षकांकडून लष्कराला पाठिंबा मिळत आहे. सर्व एजन्सींमधील समन्वय आणि गुप्तचर यंत्रणेच्या आधारे मिळालेली माहिती यावरून संयुक्त कारवाई केली जात आहे, असे सांगण्यात येत आहे.
बर्फाळ भागावर नजर
सैन्यदलाने हिवाळी भागात विशेष प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले आहेत. चोवीस तास देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन, थर्मल इमेजिंग कॅमेरे आणि आधुनिक उपकरणे वापरली जात आहेत. कमी दृश्यमानता आणि बर्फाळ प्रदेशातही हे तंत्रज्ञान लष्करासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. लष्कराची रणनीती स्पष्ट आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करा किंवा त्यांना अशा भागात बंदिस्त करा जिथे त्यांना जगणे कठीण होईल आणि पुढील कारवाया रचणे, अस प्लॅन लष्कराने आखली आहे. म्हणूनच सर्व भूभागावर सतत देखरेख ठेवली जात आहे.
चिल्लई कलानमध्ये कारवाया सुरूच
गावांमध्ये सैन्याच्या उपस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांचा लष्करावरील विश्वास वाढला आहे. संशयास्पद हालचालींची माहिती देऊन ग्राम संरक्षण रक्षक सुरक्षा दलांना मदत करत आहेत. कडाक्याच्या थंडीत आणि बर्फवृष्टीदरम्यान, भारतीय सैन्य दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडणार यावर ठाम आहे.