इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 21:33 IST2025-06-13T21:32:42+5:302025-06-13T21:33:09+5:30
इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती.

इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमावर इस्रायलने पहाटे हल्ले चढविले. यात इराणचे अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. तसेच आर्मी चिफही मारले गेले आहेत. यामुळे इराणने अण्वस्त्र कार्यक्रमावरील अमेरिकेसोबतची चर्चा बंद करण्याचा निर्णय घेतला असून इस्त्रायलविरोधात युद्धाची तयारी सुरु केली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून परिस्थितीची माहिती दिली आहे.
इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती. इस्रायल भारताचा शस्त्रास्त्र तंत्रज्ञान पुरवठादार देश आहे तर इराण हा भारताला इंधन पुरवितो. यामुळे भारत कोंडीत सापडला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यानंतर मोदींनी फोन केला होता. याची माहिती मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवर दिली आहे.
मला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा फोन आला. त्यांनी मला सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. मी भारताच्या चिंता व्यक्त केल्या आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला, असे मोदी म्हणाले आहेत.
इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने इराणच्या अणु सुविधा, क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रे आणि लष्करी कमांडरना लक्ष्य केले. या हल्ल्यात तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने या हल्ल्याला 'ऑपरेशन रायझिंग लायन'असे नाव दिले होते. या विरोधात आता इराणने प्रमुख मशीदीवर लाल निशान फडकाविले आहे. तसेच इराणचे प्रमुख खामेनेई यांनी याचा बदला घेण्यासाठी तयार रहा असे म्हटले आहे. इस्रायलने जगभरातील सर्व दुतावास तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा इराणला तातडीने करारावर सही करा नाहीतर इस्रायल खूप मोठे हल्ले सुरु करेल असे म्हटले आहे.