होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:14 IST2026-04-10T17:10:08+5:302026-04-10T17:14:39+5:30
महत्त्वाचे म्हणजे, इराणने भारताला 'मित्र देश' म्हणून या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली आहे. आतापर्यंत या मार्गावरून भारताचे ८ एलपीजी टँकर्स सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत आपले ९० टक्के तेल आणि वायू आयातीसाठी मध्यपूर्वेवर अवलंबून आहे.

होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
अमेरिका आणि इराण दरम्यान सध्या दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. मात्र, अद्यापही होर्मूझच्या समुद्रधुनीतून जहाजांच्या प्रवासासंदर्भात अनिश्चितता कायम आहे. या मार्गावरून जाणाऱ्या काही जहाजांकडून इराम तब्बल २० लाख डॉलर (सुमारे १७ कोटी रुपये) एवढे शुल्क वसूल करत असल्याचे वृत्त आहे. असे असतानाच, भारताने या सागरी मार्गावरून जहाजांच्या स्वतंत्र आणि सुरक्षित वाहतुकीची भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात, इराणच्या संसदीय राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाएद्दीन बोरौजेर्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुज पार करणाऱ्या जहाजांकडून २ दशलक्ष डॉलर ट्रान्झिट शुल्क वसूल करणे ही इराणची शक्ती दर्शवते. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे इराणवर हल्ला केला. तेव्हापासूनच तेल आणि गॅस वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे.
भारताकडून घेतले जातेय शुल्क? -
इराणकडून आकारल्या जात असलेल्या या शुल्कासंदर्भात बोलताना, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, "होर्मुजच्या समुद्रधुनीतून प्रवास करण्याच्या बदल्यात इराणला पैसे देण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास योग्य निर्णय घेतला जाईल."
महत्त्वाचे म्हणजे, इराणने भारताला 'मित्र देश' म्हणून या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली आहे. आतापर्यंत या मार्गावरून भारताचे ८ एलपीजी टँकर्स सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत आपले ९० टक्के तेल आणि वायू आयातीसाठी मध्यपूर्वेवर अवलंबून आहे.