अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवा; LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचे मंत्र्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:49 IST2026-03-12T11:48:05+5:302026-03-12T11:49:12+5:30
Iran Crisis: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे भारतात उर्जा संकट निर्माण झाले आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवा; LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचे मंत्र्यांना निर्देश
Iran Crisis: इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन देशात घबराट पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांवर कडक नजर ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या चर्चेत पंतप्रधानांनी मंत्र्यांना देशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले. विशेषतः सोशल मीडियावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याला तत्काळ उत्तर देण्याचे अथवा कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. तसेच विरोधकांकडून होणाऱ्या प्रचाराला ठोस आणि आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देण्यासही सांगितले.
भारताची तयारी इतर देशांपेक्षा मजबूत
मंत्र्यांचा आत्मविश्वास वाढवताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याची परिस्थिती केवळ एका देशापुरती मर्यादित नसून, संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होत आहे. मात्र संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी भारताची तयारी मजबूत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, शेजारील देशांशी तुलना करता भारताची तयारी अधिक सक्षम आणि प्रभावी आहे.
एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आवाहन
दरम्यान, इराणमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून, देशातील काही भागांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या उपलब्धतेवर ताण जाणवत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी तमिळनाडूमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन केले. त्यांनी सरकार जनहिताचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगितले.
होर्मुज सामुद्रधुनीबाबत भारताला दिलासा
दरम्यान, स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) मार्गावरील जहाजवाहतुकीबाबत भारताला दिलासा मिळाला आहे. या संदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री ए. जयशंकर (S Jaishankar) यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची (Abbas Araghchi) यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा केली. या चर्चेनंतर इराणने भारतीय जहाजांना होर्मुजमार्गे जाण्यास परवानगी मिळाली आहे.