नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण प्रस्थापित व्हावे तसेच लोकभावना समजून निर्णय घेता यावेत, यासाठी केंद्र सरकारने नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा यांचा आजपासून जम्मू- काश्मीर दौरा सुरू झाला आहे.
इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख असणारे दिनेश्वर शर्मा या दौ-यामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना व तसेच इतर महत्त्वाच्या लोकांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतील. मात्र ते हुर्रियतशी चर्चा करणार का?, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
जाँईँट रेझिस्टन्स लिडरशिपचे सदस्य सय्यद अली गिलानी, मीरवाइज उमर फारुख आणि यासीन मलिक यांनी दिनेश शर्मा यांच्याशी चर्चा करण्याची करण्याची शक्यता फेटाळली आहे. शर्मा यांनी मात्र आपला पहिला दौरा केवळ पुढील कामाचा आराखडा तयार करणे व राज्यातील वस्तुस्थिती जाणून घेणे यासाठीच असेल असे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. 'मला आधी लोकांना भेटू द्या, त्यांच्या भावना समजू द्या', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. दिनेश्वर शर्मा आज श्रीनगरमध्ये असून ते ९ तारखेस जम्मू विभागात जातील व ११ तारखेस दिल्लीला परत येतील.
दिनेश्वर शर्मा हे १९७९ च्या तुकडीचे केरळ कँडरचे आयपीएस अधिकारी आहेत. २०१४ साली त्यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. जम्मू आणि काश्मीरमधील विविध समस्या आणि अशांत वातावरणाच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसाममधील बंडखोर गटांशी चर्चा करण्याचीही कामगिरीही त्यांनी पार पाडली आहे.