आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 13:59 IST2018-03-03T13:59:23+5:302018-03-03T13:59:23+5:30

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला.

Initially we used to say Congress mukt Bharat but now we can say Vaampanth Mukt Bharat also says Ravi Shankar Prasad | आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद

आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील निकाल पाहता भारत केवळ 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासून मुक्त होईल, असे विधान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ते शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ज्याप्रकारे ईशान्य भारतातील जनता भाजपाच्या पाठिशी उभी राहिली आहे, ते पाहता काही गोष्टी बदलण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आम्ही काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा द्यायचो. मात्र, आता आम्हाला 'डावे मुक्त भारत' अशी घोषणाही द्यावी लागेल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघायल आणि नागालँड या तीन राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये त्रिपुरात भाजपाने ऐतिहासिक यश संपादित करत डाव्यांची सत्ता उलथवून लावण्याचा पराक्रम करून दाखवला. तर नागालँडमध्येही भाजपाने एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांच्या  नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीशी (एनडीपीपी) भाजपाने युती केली होती. दुपारी 12 वाजेपर्यंतचे निकाल पाहता, नागालँडमध्येही भाजपने नव्या मित्रासोबत (एनडीपीपी) चांगले यश मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. तर मेघालयमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी याठिकाणी भाजपाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. हेमंत बिश्व शर्मा हे लवकरच मेघालयमध्ये जातील, असे राम माधव यांनी सांगितले. सध्या देशातील केवळ पाच घटक राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस मेघालय कायम राखणार का, याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.



Web Title: Initially we used to say Congress mukt Bharat but now we can say Vaampanth Mukt Bharat also says Ravi Shankar Prasad