प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:58 IST2025-06-11T06:54:07+5:302025-06-11T06:58:35+5:30
India's population: संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५मध्ये १.४६ अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी झाली आहे.

प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५मध्ये १.४६ अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी झाली आहे.
वास्तविक प्रजनन संकट असे शीर्षक असलेला यूएनएफपीएचा लोकसंख्या स्थिती अहवाल २०२५ प्रसिद्ध झाला असून, यात म्हटले आहे की, घटत्या प्रजनन क्षमतेबद्दल घाबरण्याऐवजी अपूर्ण प्रजनन लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. लाखो लोक त्यांचे वास्तविक प्रजनन लक्ष्य प्राप्त करण्यात सक्षम नाहीत.
प्रजनन दर कमी होणे हे संकट नाही; तर संकट हे आहे की लोकांना त्यांच्या मनासारखे निर्णय घेता येत नाहीत. लग्न, लैंगिक संबंध, गर्भनिरोधक वापरणे किंवा मुले होऊ द्यायची की नाही, हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नाही.
भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती
सध्याची लोकसंख्या : सुमारे १४६.३ कोटी
० ते १४ वयोगट: २४%
१० ते १९ वयोगट: १७%
१० ते २४ वयोगट: २६%
१५ ते ६४ वयोगट (कामकाजासाठी योग्य वय) ६८%
६५ वर्षांवरील वृद्ध लोकसंख्या : सध्या ७%
आयुर्मान आणि जन्मदर
पुरुषांचे सरासरी आयुर्मान : ७१ वर्षं
स्त्रियांचे सरासरी आयुर्मान : ७४ वर्षं
एकूण प्रजनन दर : १.९ अपत्य प्रति स्त्री
(लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी २.१ आवश्यक असतो.)
भारतात मोठा बदल कसा झाला?
१९६० मध्ये लोकसंख्या ४३.६ कोटी होती. त्यावेळी प्रत्येक महिला सरासरी ५ मुलांना जन्म देत होती. फार कमी स्त्रिया गर्भनिरोधक वापरत होत्या. अर्ध्याहून कमी स्त्रिया शाळेत जात होत्या.
१९७०मध्ये प्रति महिला सुमारे पाच मुले होत होती. आज दोन मुलांपर्यंत ही स्थिती आहे. यासाठी शिक्षण व प्रजनन आरोग्य प्रभावी ठरले आहे.