पाकिस्तानचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला, सीमेवर एका घुसखोराचा केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 18:05 IST2024-12-25T18:05:26+5:302024-12-25T18:05:59+5:30
Pakistani intruder killed, India BSF: ठार केलेल्या घुसखोराकडून पाकिस्तानी चलन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या

पाकिस्तानचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला, सीमेवर एका घुसखोराचा केला खात्मा
Pakistani intruder killed, India BSF: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण कायमच तणावपूर्ण असते. दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहणी करत असतात. पण अशातच पाकिस्तानचाभारतीय सीमेमध्ये घुसण्याचा एक प्रयत्न भारताच्या बीएसएफ जवानांनी हाणून पाडला. राजस्थानच्या गंगानंगरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घालण्यात बीएसएफ जवानांना यश आले. तो घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय लष्कराने त्याचा खात्मा केला. त्याच्याकडून पाकिस्तानी चलन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
सीमेवर सैनिक गस्त घालत होते. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या सैनिकांना पाहून घुसखोर पळू लागला. सैनिकांनी ताबडतोब सतर्कतेने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बीएसएफने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, घुसखोर पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. सैनिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला नाही तर तो भारतीय हद्दीत आला असता. त्याला रोखण्याच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला. घुसखोराकडून पाकिस्तानी चलन आणि इतर संशयास्पद वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, घडलेल्या घटनेचा अधिक बारकाईने तपास केला जात आहे.
गेल्या काही दिवसात घुसखोरीच्या अनेक घटना
पाकिस्तान सीमेवरून घुसखोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अलीकडेच, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांच्या वाढत्या घटना पाहता, बीएसएफने जम्मू प्रदेशात २००० हून अधिक सैनिकांची नवीन बटालियन तैनात केली आहे. या बटालियन्स आधी ओडिशात नक्षलविरोधी कारवायांमध्ये तैनात होत्या, पण आता त्यांना जम्मू आणि पंजाब सीमेवर सुरक्षा मजबूत करण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. सांबा आणि जम्मू क्षेत्रातील इतर संवेदनशील भागात सैनिक तैनात करण्यात आले आहेत. सीमेवरील घुसखोरी थांबवणे आणि दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. बीएसएफचा हा उपक्रम देशाची सीमा सुरक्षा आणि सुरक्षितता अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.