भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:58 IST2026-04-05T14:56:26+5:302026-04-05T14:58:59+5:30
Indian Air Force: मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Indian Air Force: मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऑपरेशन सिंदूरमधून मिळालेल्या अनुभवानंतर भारताने संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. युद्धाच्या वेळी शस्त्रांची उपलब्धता आणि त्यांची मारक क्षमता किती महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाने भारतीय वायुसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी स्वदेशी १००० किलो हवाई बॉम्ब खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाने ६०० बॉम्बसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टदेखील जारी केला आहे.
शत्रूचे मोठे तळ एका झटक्यात उद्ध्वस्त होणार
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, हे स्वदेशी बॉम्ब अमेरिकेच्या MK-84 वर्गातील बॉम्बइतके शक्तिशाली असतील. MK-84 बॉम्ब सुमारे २००० पाउंड, म्हणजेच अंदाजे ९०७ किलो विस्फोटक वाहून नेऊ शकतो. त्यामुळे हे बॉम्ब शत्रूचे मोठे तळ, पूल, रनवे, गोदामे किंवा इतर लष्करी ठिकाणे पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता ठेवतात. आतापर्यंत भारतीय वायुसेना अशा प्रकारचे बॉम्ब परदेशातून खरेदी करत होती, मात्र आता ते देशातच तयार केले जाणार आहेत.
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे बॉम्ब
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या EOI नुसार एकूण ६०० स्वदेशी १००० किलो हवाई बॉम्ब तयार करून खरेदी केले जाणार आहेत. या बॉम्बसह टेल युनिट आणि इतर आवश्यक उपकरणांचाही समावेश असेल. हा संपूर्ण प्रकल्प ‘Buy Indian’ श्रेणीत राबवला जाणार असून, सर्व उत्पादन भारतातच होणार आहे. त्यामुळे भारतीय संरक्षण उद्योग आणि खासगी कंपन्यांना मोठी संधी मिळणार आहे.
या बॉम्बची वैशिष्ट्ये पाहता, स्फोटानंतर हे बॉम्ब तुकड्यांमध्ये विखुरले जातील आणि मोठ्या क्षेत्रात नुकसान करतील. हे उच्च क्षमतेचे बॉम्ब असून, रशियन आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या विमानांवर वापरता येतील. त्यामुळे भारतीय वायुसेनेच्या आक्रमक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे.
६०० बॉम्ब खरेदी केले जाणार...
पहिल्या टप्प्यात सहा प्रोटोटाइप बॉम्ब तयार केले जातील. यात लाईव्ह (विस्फोटक) आणि इनर्ट (बिनविस्फोटक) बॉम्बचा समावेश असेल. यामध्ये टेल युनिट आणि इतर उपकरणे विकसित केली जातील आणि त्यानंतर ट्रायल्स घेऊन तांत्रिक तपासणी केली जाईल. या टप्प्यात किमान ५० टक्के स्वदेशी सामग्री वापरणे आवश्यक असेल. दुसऱ्या टप्प्यात पात्र कंपन्यांना कमर्शियल रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) जारी केला जाईल आणि त्यानंतर एकूण ६०० बॉम्बची खरेदी करण्यात येईल.
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात प्रोटोटाइप तयार करणे, युजर ट्रायल्स, मूल्यांकन, व्यावसायिक प्रक्रिया आणि अंतिम करार यांचा समावेश असेल. ट्रायल्स भारतातच वायुसेनेच्या ठिकाणी आणि ठराविक विमानांवर करण्यात येणार आहेत. या स्वदेशी १००० किलो हवाई बॉम्बमुळे भारतीय वायुसेनेची फायर पॉवर मोठ्या प्रमाणात वाढणार असून परदेशी शस्त्रांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच भारतीय संरक्षण उद्योग आणि खासगी कंपन्यांना मोठी चालना मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.