Tariff on India: भारत-अमेरिका व्यापार शुल्क, नव्या निर्णयामुळे भारताचा फायदा की तोटा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 07:50 IST2026-02-22T07:50:16+5:302026-02-22T07:50:51+5:30
Tariff on India by US: अमेरिकेने हे शुल्क सरसकट सर्व देशांसाठी कमी केल्याने भारताच्या विशेष फायद्यावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Tariff on India: भारत-अमेरिका व्यापार शुल्क, नव्या निर्णयामुळे भारताचा फायदा की तोटा?
नवी दिल्ली: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात मालावर १० टक्के नवीन 'जागतिक शुल्क' जाहीर केले होते. शनिवारी ट्रम्प यांनी हे शुल्क वाढवून १५ टक्के केले. त्यामुळे भारताला १८ टक्क्यांऐवजी १५ टक्के असे कमी शुल्क आता भरावे लागेल.
मात्र, अमेरिकेने हे शुल्क सरसकट सर्व देशांसाठी कमी केल्याने भारताच्या विशेष फायद्यावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या नव्या शुल्क रचनेमुळे भारतीय कंपन्या व अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल, याचा हा आढावा.
शुल्कातील मोठी घट
पूर्वीची स्थिती : रशियाकडूनची तेल खरेदी आणि इतर कारणांमुळे भारतावर एकूण २५ टक्के ते ५० टक्केपर्यंत 'पारस्परिक शुल्क' (रेसिप्रोकल टॅरिफ) लागू होते.
नवा बदल : २४ फेब्रुवारी २०२६ पासून भारताला केवळ १५ टक्के जागतिक शुल्क भरावे लागेल. हे शुल्क पुढील १५० दिवसांसाठी लागू असेल.
उदाहरण : जर एखाद्या भारतीय उत्पादनावर ५ टक्के सामान्य आयात शुल्क असेल, तर आता त्यावर १५ टक्के अतिरिक्त शुल्क लागून एकूण २० टक्के कर होईल. पूर्वी हेच प्रमाण ५% ते २५% असे ३०% होते.
भारतावर शुल्क कसे बदलले?
एप्रिल २०२५ : २६ टक्के पारस्परिक शुल्क जाहीर.
ऑगस्ट २०२५ : रशियाच्या तेल खरेदीमुळे अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्क (एकूण ५० टक्के).
फेब्रुवारी २०२६ (सुरुवात): अंतरिम करारानुसार हे
शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे ठरले होते.
२१ फेब्रुवारी २०२६ : हे सरसकट १५ टक्के झाले आहे.
'पारस्परिक शुल्क' म्हणजे ?
हा शब्द ट्रम्प प्रशासनाने पहिल्यांदा वापरला. जर एखादा देश अमेरिकेच्या वस्तूंवर 'क्ष' टक्के कर लावत असेल, तर अमेरिकाही त्या देशाच्या मालावर तेवढाच 'क्ष' टक्के कर लावेल. यालाच 'लेव्हल 3 प्लेइंग फील्ड' असे म्हटले जाते. एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेने २६ टक्के शुल्क लावले.
तज्ज्ञांचे मत : कराराचे पुनर्मूल्यांकन आवश्यक?
थिंक टैंक 'जीटीआरआय'चे संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या मते: भारताने अमेरिकेला सवलती दिल्या होत्या, कारण अमेरिका भारतावरचे शुल्क १८ टक्के करणार होती.
पण, आता अमेरिकेने स्वतःहून ते १५ टक्के केले आहे. व्यापार हा काही दानधर्म नाही, दोन्ही बाजूंचा फायदा व्हायला हवा. त्यामुळे भारताने आता या व्यापार कराराचे पुन्हा मूल्यमापन करणे गरजेचे आहे.
भारतासाठी तत्काळ फायदा असा की शुल्क २५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आले आहे.
भारत-अमेरिका व्यापार आकडेवारी (२०२४-२५)
१८६ अब्ज डॉलर एकूण व्यापार
- ८६.५ अब्ज डॉलर भारताची निर्यात
- ४५.३ अब्ज डॉलर भारताची आयात
व्यापार संकलित : भारताकडे ४१ अब्ज डॉलरचा नफा आहे. म्हणजेच भारत अमेरिकेला जास्त माल विकतो आणि कमी खरेदी करतो.