‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताने गाठला महत्त्वाचा पल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:57 IST2020-10-10T02:23:09+5:302020-10-10T06:57:42+5:30
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून डीआरडीओचे अभिनंदन

‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; भारताने गाठला महत्त्वाचा पल्ला
नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी नव्या पिढीतील अॅन्टी रेडिएशन (विकरण किंवा प्रारणरोधी) ‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र भारतीय वायुदलाच्या सामरिक शस्त्रागाराचा एक महत्त्वाचे अस्त्र असेल. भारतीय बनावटीचे या विकरणरोधी क्षेपणास्त्राची गती मॅक-२ किंवा ध्वनिवेगापेक्षाही दुप्पट आहे. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
हे क्षेपणास्त्र ओडिशातील बालासोरस्थित एकात्मिक चाचणी क्षेत्रातून सकाळी १०.३० वाजता प्रक्षेपित करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.
ठळक वैशिष्ट्ये...
‘रुद्रम-१’ क्षेपणास्त्र २५० किलोमीटरच्या पल्ल्यातील शत्रूंचे रडार, हवाई संरक्षण प्रणाली आणि संपर्क यंत्रणा उद्ध्वस्त करू शकते.
या क्षेपणास्त्राचा वेग मॅक-२ किंवा ध्वनिवेगापेक्षा दुप्पट आहे.
कोणत्याही प्रकारचे सिग्नल आणि उत्सर्जित किरणे (रेडिएशन) पकडू शकते, तसेच किरणोत्सारी वारंवारता प्रसारण करणारी किंवा उत्सर्जित करणारे लक्ष्यावर अचूक निशाणा साधू शकते.