आदमपूर एअरबेसवर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा केला. याठिकाणी S400 सोबत मोदींच्या फोटोने पाकिस्तानचं पितळ उघडं पडले. आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानकडून चालला होता. त्याने भारताचे एस ४०० वरही टार्गेट केल्याचे म्हटले. परंतु मोदींनी या एअरबेसवर जात तिथे जवानांसोबत संवाद साधला. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेला खोटा प्रचार जगासमोर उघड झाला.
आदमपूर एअरबेस पाकिस्तानसाठी कायम कटू आठवण देणारा आहे. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मूर्ख पाकिस्तानी सरकारने आदमपूर एअरबेसवर पाकचे कमांडो उतरवले परंतु स्थानिक पंजाबी लोक आणि शेतकऱ्यांनी लाठीकाठ्यांनी, घरगुती शस्त्रांनी या कमांडोंना इतकं मारले त्यामुळे पाकची प्रतिमा मलिन झाली. पाकिस्तानी सीमेपासून १०० किमी अंतरावरील आदमपूर एअरबेस पंजाबमधील भारतीय हवाई दलाचे दुसरा सर्वात मोठा बेस आहे. जालंधर आणि होशियापूर दरम्यान असलेला हा एअरबेस इतिहासातील शौर्याची साक्ष देणारा आहे.
आदमपूर एअरबेसहून पाकिस्तानच्या कुठल्याही ठिकाणी टार्गेट हल्ला करू शकतो. भारतीय हवाई दलाचे ते ४७ वं स्क्वाड्रन आहे. ज्याला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखले जाते. १९६५ च्या युद्धात आदमपूर एअरबेससह पठाणकोट आणि हलवारा एअरबेसने पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते. त्यामुळे हलवारा, आदमपूर आणि पठाणकोट हे भारतीय हवाई दलाचे ३ केंद्र पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत होते. पाकिस्तानी वायू सेनेचे एअर कमांडर तुफैल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. १९६५ च्या युद्धात तत्कालीन पाकिस्तानी वायूसेनाध्यक्ष एअर मार्शल असगर खान यांच्या डोक्यात सुपीक कल्पना आली. परंतु युद्ध सुरू होण्याआधीच त्यांनी पद सोडले. परंतु त्यांचा उत्तराधिकारी नूर खानने ही योजना सुरूच ठेवली.
काय होते प्लॅनिंग?
योजनेनुसार, भारताच्या तिन्ही एअरबेसवर ३ टीम एअरड्रॉप केले जातील. प्रत्येक टीममध्ये ३ अधिकाऱ्यांसह ६० कमांडो असतील. त्यांना सी १३० विमानांनी हवाई मार्गाने उतरवले जाईल. प्रत्येक टीमकडे वायरलेस असतील त्यातून संपर्क साधता येत होता. प्रत्येक कमांडोकडे २ दिवसाचे रेशन होते त्याशिवाय ४०० रूपये आणि शस्त्रे, स्फोटके, ग्रेनेड देण्यात आली होती. ७ सप्टेंबर १९६५ साली पाकिस्तानने सकाळी या तिन्ही एअरबेसवर हल्ला केला. पठाणकोट एअरबेसच्या बाजूला ६४ एसएसजी पाकिस्तानी कमांडो विमानातून उतरले. आदमपूर एअरबेसला ५५ पाकिस्तानी कमांडो उतरले तर हलवारा येथे ६३ कमांडो उतरले होते.
पाकिस्तानी कमांडो आदमपूर इथल्या एका गावाच्या मधोमध उतरले. तेव्हा स्थानिकांची नजर त्यांच्यावर पडली. त्यानंतर पारंपारिक हत्यारे, शस्त्रे घेऊन गावकऱ्यांनी पाकिस्तानी फौजेला पळवत पळवत मारले. काही पाकिस्तानी ऊसाच्या शेतात लपले. स्थानिकांनी दिसेल त्याला मारण्यास सुरुवात केली. त्याच काळात पंजाब पोलीस आणि भारतीय सैन्य तिथे पोहचले. इथून ४२ पाकिस्तानी कमांडो पकडण्यात आले आणि १२ जणांना चकमकीत ठार केले. पठाणकोट एअरबेसजवळही असेच घडले. तिथे ४५ कमांडो पकडले आणि ४ जणांना ठार केले, काही जण डोंगराळ भागातून पळून जाण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, हलवारा येथेही चित्र तसेच होते. पाकिस्तानी कमांडोला एका गावात एअर ड्रॉप केले. देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे लोक सतर्क होते. गावकऱ्यांनी त्वरीत पाकिस्तानी फौजेला ओळखले आणि काहींनी पुढाकार घेऊन त्यांना पकडले. याठिकाणी झालेल्या गोळीबारात ५३ पाकिस्तानी फौजेला पकडले. ६ पळून गेले तर ४ जणांना ठार केले. या संपूर्ण ऑपरेशनमुळे पाकिस्तानची दक्षिण आशियात चांगलीच फजिती झाली. यात पाकिस्तानचे १४० कमांडो भारतीय सैन्याने पकडले तर २० मारले गेले. २२ पळून गेले.