India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:19 IST2025-05-09T11:19:02+5:302025-05-09T11:19:38+5:30
जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
जम्मू - पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून १०० दहशतवाद्यांना ठार केले. भारताच्या या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी मिसाईल, ड्रोन हल्ले भारताने उधळले. परंतु काही ठिकाणी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे घरे, दुकाने पडली आहेत. खासकरून जम्मू काश्मीरात नागरी वस्तीत हल्ले केले गेलेत. सैन्य कारवाईत बऱ्याचदा दहशतवादी लपण्यासाठी सर्वसामान्यांची घरांचा वापर करतात. अशावेळी लोकांच्या घराला नुकसान पोहचते.
जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर आहे, हो...केंद्रीय गृह मंत्रालयाने एक विशेष योजना आणली आहे. Central Scheme For Assistance Towords Damanged Immovable/Movable Property During Action by CPMF Army in Jammu and Kashmir या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचे घर आणि त्यांच्या साहित्याच्या नुकसानीसाठी १० लाख रूपये देते. ही योजना २०१० पासून सुरू आहे.
#WATCH | Damaged walls, broken windows, debris on the ground after Pakistan targets civilian areas along LoC in Jammu & Kashmir
— ANI (@ANI) May 9, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Df1HlESdaq
दहशतवादी तळांना भारताने टार्गेट केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यामुळे थेट हल्ल्यासोबतच तो दहशतवादी हल्ल्याचा कट रचू शकतो. जर एखादा दहशतवादी घरात लपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला साथ न देता सैन्याला साथ देण्याचं आवाहन करण्यात येते. ऑपरेशन करताना तुमचे जे काही नुकसान होईल त्याची भरपाई सरकारकडून केली जाते. त्यामुळे नुकसानीची चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या या योजनेतून केवळ घराचे नुकसान दिले जात नाही तर घरातील साहित्य, आवश्यक वस्तू यासाठीही पैसे दिले जातात.
किती पैसे मिळतात?
सैन्याच्या ऑपरेशनवेळी नुकसान झाले असेल तर त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हापातळीवर समिती काम करते. त्यात नुकसान भरपाई म्हणून १० लाखांपर्यंत मदत मिळू शकते. घराच्या नुकसानीसाठी ७ लाख आणि साहित्याच्या नुकसानीसाठी ३ लाखापर्यंत मदत देण्याची तरतूद आहे. या साहित्यात घरातील फ्रिज, टीव्ही, संगणक, वॉशिंग मशिन, फर्निचर यांचा समावेश असतो. ही मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. ही मदत मिळवण्यासाठी ऑपरेशन सुरू झाल्यापासून ३० दिवसात अर्ज करावा लागतो.