चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:48 IST2025-05-11T05:46:38+5:302025-05-11T05:48:09+5:30
चीनने भारत आणि पाकिस्तानला शांततेचे तसेच दोन्ही देशांतील तणावावर वाटाघाटीच्या मार्गाने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
नवी दिल्ली: चीनने भारत आणि पाकिस्तानला शांततेचे तसेच दोन्ही देशांतील तणावावर वाटाघाटीच्या मार्गाने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू, असे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून तणावाची आम्हाला चिंता वाटते. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना विनंती करतो की, त्यांनी शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने काम करावे.
पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय बैठक
भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंथी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये शस्त्रसंथीनंतरच्या स्थितीवर तसेच लष्करी सज्जतेबाबत चर्चा करण्यात आल्याचे कळते. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. पहलगाममध्ये हल्ला करून २६ जणांची हत्या करणारे व या कटामागील सूत्रधारांना त्यांनी कल्पना केली नसेल, अशी कठोर कारवाई करू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.
आकाश, बराक अन् 'शिल्का'ने मोडले पाकिस्तानचे कंबरडे
पाकची अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले भारताने उद्ध्वस्त केले. हे शक्य झाले भारताच्या भक्कम संरक्षण प्रणालीमुळे. एस-४००, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली तर भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची ताकद आहे, मात्र तोफा व क्षेपणास्त्रांनी भक्कम असलेली आपली सुरक्षा प्रणाली पाकच्या चारीमुंड्या चीत करण्यास सक्षम आहे.
यूट्यूब चॅनेल ब्लॉक; कोर्टात सुनावणी
केंद्र सरकारकडून यूट्यूब चॅनेल 'फोर पीएम' हे ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा आदेश रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात १३ मे रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. कोर्टाने 'फोर पीएम' या डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मचे संपादक संजय शर्मा यांच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांकडून उत्तर मागितले आहे. चॅनेलचे ब्लॉकिंग म्हणजे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आक्रमण असून जनतेला माहिती मिळवण्याच्या अधिकारावरदेखील मोठा आघात आहे, असे याचिकेत म्हटले आहे.