PM Modi Spoke Indian Astronaut Shubhanshu Shukla: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अॅक्सियम मिशन ४ वर असलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाने या संभाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. दोघांमध्ये १८ मिनिटे संभाषण सुरु होतं. शुभांशू आज तुम्ही भारतीय भूमीपासून दूर आहात पण भारतीयांच्या सर्वात जवळ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी शुभांशू शुक्ला यांनी पृथ्वीवर कोणत्याही सीमा नाहीत, आपण सर्व एक आहोत, असं म्हटलं.
४१ वर्षांनंतर अवकाशात पोहोचलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद सावदा. संभाषणादरम्यान शुभांशू यांनी अंतराळातील त्यांचे अनुभव सांगितले. तसेच जागतिक स्तरावर भारत आज अवकाश विज्ञानात किती आघाडीवर आहे हे त्यांनी सांगितले. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू हे दोन दिवसांपूर्वी २६ जून रोजी दुपारी ४.०१ वाजता २८ तासांच्या प्रवासानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी गप्पा मारल्या.
"तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे इथे येऊन खूप छान वाटत आहे. पृथ्वीपासून कक्षेपर्यंतचा माझा ४०० किमीचा प्रवास खूप महत्त्वाचा होता. मी अंतराळात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना आज मला अभिमान वाटतोय. हा प्रवास फक्त माझा नाही तर संपूर्ण देशाचा प्रवास आहे. तुमच्या नेतृत्वाखाली आजचा भारत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक संधी देतोय," असं शुभांशू शुक्ला यांनी म्हटलं. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक भारतीय पाहत आहे की तुम्ही किती साधे आहात. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना गाजराचा हलवा दिला का? यावर शुभांशू यांनी हो, मी माझ्या सहकाऱ्यांना गाजराचा हलवा दिला, असं सांगितलं.
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी तुम्हाला पृथ्वी मातेला प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळाली आहे, तुम्ही सध्या कुठे आहात? असं विचारलं. त्यावर शुभांशू यांनी, आम्ही निश्चित सध्या कुठे आहोत सांगता येणार नाही. आम्ही १६ वेळा प्रदक्षिणा घालतो, १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्त पाहतो. आम्ही २८ हजार किमी/तास वेगाने प्रवास करतो. हा वेग आपला देश किती वेगाने पुढे जात आहे हे दर्शवतो, असं म्हटलं.
"पहिले दृश्य पृथ्वीचे होते. ते पाहिल्यानंतर माझ्या मनात पहिला विचार आला की पृथ्वी एकसारखीच आहे. बाहेरून कोणतीही सीमारेषा किंवा सीमा दिसत नाही. जेव्हा मी भारत पाहिला तेव्हा तो खूप भव्य आणि मोठा दिसत होता. पृथ्वी विविधतेत एकता दर्शवते. पृथ्वी आपले घर आहे आणि आपण सर्व एक आहोत," असंही शुभांशू शुक्ला यांनी म्हटलं.
बोलण्यासाठी बांधले पाय
शुभांशूने पंतप्रधान मोदींना सांगितले की, "तुमच्याशी बोलताना मी माझे पाय बांधले आहेत कारण येथे गुरुत्वाकर्षण शून्य आहे. जर मी हे केले नाही तर मी तरंगायला सुरुवात करेन. इथे झोपणे हे एक मोठे आव्हान आहे. चालणे, खाणे-पिणे हे देखील आव्हान आहे. कारण आपल्या शरिराला गुरुत्वाकर्षणाची खूप सवय झालेली असते, त्यामुळे इथे ते सर्व खूप कठीण होते."
भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय - पंतप्रधान मोदी
"आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की भारताच्या गगनयान मोहिमेच्या यशाचा हा पहिला अध्याय आहे. तुमचा हा ऐतिहासिक प्रवास केवळ अवकाशापुरता मर्यादित नाही, तर तो विकसित भारताच्या आपल्या प्रवासाला गती आणि नवीन बळ देईल. भारत आता जगासाठी अवकाशातील नवीन उपक्रमांसाठी दरवाजे उघडणार आहे. आता भारत केवळ उड्डाण करणार नाही, तर भविष्यात नवीन उड्डाणांसाठी व्यासपीठ तयार करेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.