Rahul Gandhi On AI: "भारत आज रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानात अमेरिका आणि चीनच्या तुलनेत कुठेच नाही. दुर्दैवाने, आपण आपला सर्वात मोठा खजिना असलेला डेटा अमेरिकेच्या हवाली केला आहे," अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली. केरळमधील मरियन कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
डेटा गमावला तर भविष्य संपेल!
राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापारी करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, "एआयच्या खेळात फक्त अमेरिका आणि चीन हेच दोन मोठे खेळाडू आहेत. भारताकडे प्रचंड डेटा आहे, पण आपण तो अमेरिकेला देऊन टाकला. चीनमध्ये ते व्हॉट्सॲप वापरत नाहीत कारण त्यांना त्यांचा डेटा स्वतःच्या नियंत्रणात हवा असतो. आपण मात्र आपले फोन आणि माहिती परकीय शक्तींच्या ताब्यात दिली आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
अंबानी-अदानींवरही टीका
"भारतात अंबानी आणि अदानींसारखे उद्योगपती काहीही उत्पादन करत नाहीत. ते फक्त चिनी वस्तू भारतात विकण्याचे काम करत आहेत. जोपर्यंत आपण स्वतः उत्पादन करत नाही आणि आपल्या डेटावर आपले नियंत्रण राहत नाही, तोपर्यंत आपण एआय क्षेत्रात शक्तिशाली होऊ शकत नाही," अशी टीकाही त्यांनी केली.
शिक्षण संस्थांवर आरएसएसचा ताबा?
उच्च शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, "आज भारतीय शिक्षण व्यवस्थेवर वैचारिक आक्रमण होत आहे. बहुतांश कुलगुरूंची नियुक्ती केवळ ते आरएसएसशी संबंधित आहेत म्हणून केली जात आहे. ही विचारसरणी लादणे थांबवले पाहिजे, अन्यथा भारतीय शिक्षण व्यवस्था संकुचित होईल."
दिल्लीतील एआय समिटमध्ये झाला होता मोठा राडा
राहुल गांधींच्या या टीकेला दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय एआय समिटमधील एका घटनेने अधिक बळकटी दिली. काही दिवसांपूर्वी प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरलेल्या भारत मंडपममध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. या समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीने एका रोबोटिक श्वानाचे प्रदर्शन केले होते. त्यांनी हा रोबोट स्वतःचा शोध असल्याचा दावा केला होता, मात्र तो प्रत्यक्षात एका चिनी कंपनीचा असल्याचे उघड झाले. या कॉपी-पेस्ट तंत्रज्ञानामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्याची टीका झाली होती.
या फसवणुकीच्या विरोधात आणि सरकारच्या धोरणांविरोधात युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कडेकोट सुरक्षा भेदून भारत मंडपममध्ये प्रवेश केला. कार्यकर्त्यांनी तिथे चक्क आपले शर्ट काढून निदर्शनं केली. मोदी सरकारच्या 'मेक इन इंडिया'च्या नावाखाली चिनी उत्पादने कशी खपवली जात आहेत, याचा त्यांनी निषेध केला.
Web Summary : Rahul Gandhi criticized Modi government, alleging India's AI data was handed to America. He questioned India-US trade deal, highlighting dependence on foreign tech and lack of domestic production. He also criticized RSS influence on education and highlighted a scandal at Delhi's AI summit.
Web Summary : राहुल गांधी ने मोदी सरकार पर हमला करते हुए कहा कि भारत का AI डेटा अमेरिका को सौंप दिया गया। उन्होंने भारत-अमेरिका व्यापार समझौते पर सवाल उठाया, विदेशी तकनीक पर निर्भरता और घरेलू उत्पादन की कमी पर प्रकाश डाला। उन्होंने शिक्षा पर आरएसएस के प्रभाव की आलोचना की और दिल्ली के AI शिखर सम्मेलन में एक घोटाले पर प्रकाश डाला।