भारताची मोठी कामगिरी! माता मृत्यूदरात ८०% घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 11:04 IST2026-03-29T11:03:55+5:302026-03-29T11:04:08+5:30
'द लॅन्सेट' वैद्यकीय नियतकालिकाचा अहवाल

भारताची मोठी कामगिरी! माता मृत्यूदरात ८०% घट
नवी दिल्ली: भारताने आरोग्य क्षेत्रात एक मैलाचा दगड गाठला असून १९९० च्या तुलनेत २०२३ पर्यंत देशातील माता मृत्यूदरात ८० टक्क्यांची घट झाली आहे. एका नवीन जागतिक विश्लेषण अहवालानुसार, १९९० मध्ये प्रति एक लाख जन्मांमागे ५०८ असलेला हा दर २०२३ मध्ये ११६ वर खाली आला आहे. 'द लॅन्सेट' या वैद्यकीय नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
अहवालात असेही नमूद केले आहे की, जगभरात १९९० च्या तुलनेत माता मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांशने कमी झाले आहे, तरी प्रगतीचा वेग मंदावला आहे.
भारतीय योजनांना मान्यता
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसव सुनिश्चित करण्यासाठी सरकारने राबवलेल्या योजनांना जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे. भारताने माता मृत्यूदर प्रति लाख जन्मांमागे ७० च्या खाली आणण्याचे 'शाश्वत विकास ध्येय' २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले.
ताज्या नमुना नोंदणी प्रणालीनुसार, देशातील हा दर सध्या ८८ पर्यंत खाली आला असून लवकरच भारत ७० चा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जगातील २०४ देशांपैकी १०४ देश अजूनही ७० पेक्षा कमी माता मृत्यूदराचे लक्ष्य गाठू शकलेले नाहीत. भारताची ही कामगिरी अशा देशांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
जागतिक स्थिती : २०२३ मध्ये जगभरात एकूण २.४ लाख मातांचा मृत्यू झाला, म्हणजे प्रति एक लाख जन्मांमागे १९०.५ मातांचा मृत्यू झाला. १९९० च्या तुलनेत हे प्रमाण एक तृतीयांशने कमी आहे, जेव्हा हा दर ३२१ होता.
जागतिक स्तरावर भारताची स्थिती नक्की कशी आहे?
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन' (आयएचएमई) ने केलेल्या या अभ्यासानुसार, २०२३ मध्ये भारतात एकूण २४,७०० माता मृत्यूची नोंद झाली. याच काळात नायजेरियात ३२,९००, इथियोपियात ११,९०० आणि पाकिस्तानात १०,३०० माता मृत्यूच्या घटना घडल्या. गेल्या ३० वर्षांत भारताने केलेली प्रगती ही जागतिक सरासरीपेक्षा (४८ टक्के घट) किती तरी पटीने अधिक आहे.