भारताचा 'बॅलन्स प्लॅन': भूमिगत गुहांमध्ये ६० दिवसांचा तेल साठा; अशी आहे चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:43 IST2026-03-11T15:42:16+5:302026-03-11T15:43:36+5:30
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाची धग जगातील अनेक राष्ट्रांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. असे असतानाच जगातील २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक ...

भारताचा 'बॅलन्स प्लॅन': भूमिगत गुहांमध्ये ६० दिवसांचा तेल साठा; अशी आहे चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशची स्थिती
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाची धग जगातील अनेक राष्ट्रांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. असे असतानाच जगातील २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणने सुरुंग पेरल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आपण ते नष्ट केले आहेत, असे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे. भारताचे सुमारे ५० टक्के तेल याच मार्गावरून येते. या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, भारताची ऊर्जा सुरक्षा नेमकी किती भक्कम आहे आणि शेजारील देशांकडे किती तेल साठा आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे.
कशी आहे भारताची सज्जता? -
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, ऊर्जा तज्ज्ञ नरेंद्र तनेजा म्हणाले, भारताच्या एकूण तेलाच्या गरजांपैकी ९०% तेल आयात केले जाते.
भारताकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह, रिफायनरी आणि व्यावसायिक साठा मिळून एकूण २५ कोटी बॅरल (सुमारे ४,००० कोटी लिटर) तेल उपलब्ध आहे, जे ५० ते ६० दिवस पुरू शकते. मात्र, तांत्रिक मर्यादांमुळे प्रत्यक्षात ४० दिवसांचेच तेल वापरता येण्याजोगे आहे. हा साठा मंगळुरू, पाडूर आणि विशाखापट्टणम येथील मोठ्या भूमिगत गुहांमध्ये (Underground Caves) सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
अशी आहे शेजारील देशांची स्थिती:
चीन : जगातील मोठा तेल खरेदीदार असलेल्या चीनने रशिया आणि इराणकडून मोठ्या प्रमाणावर आयात केली आहे. चीनकडे सध्या १५० कोटी बॅरलचा साठा असून, तो ९० ते १०० दिवस पुरू शकतो.
पाकिस्तान : वर्ल्डोमीटरच्या २०२५ च्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानकडे २४३ दशलक्ष बॅरल तेलाचे साठे आहेत. तथापि, त्यावर प्रक्रिया केली जात नाही. पाकिस्तानकडे २८ दिवसांचे पेट्रोल आणि डिझेलचे साठे आहेत. पाकिस्तानची परिस्थिती आधीच गंभीर आहे. मध्य पूर्व संकटापासून तेथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.
बांगलादेश : ताज्या आकडेवारीनुसार, बांगलादेशाकडे ३५ ते ४० दिवस पुरेल इतका तेल साठा उपलब्ध आहे.
तत्पूर्वी, देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही आणि सरकार जागतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे केंद्राने म्हटले आहे.