अजब फर्मान! 'या' गावात चुकूनही करू नका प्रेम, लव्ह मॅरेजवर आणली बंदी; ३ कुटुंबावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:06 IST2026-01-27T11:06:12+5:302026-01-27T11:06:59+5:30
Ratlam Love Marriage Ban: गावातील जो कुणी युवक अथवा युवती पळून जाऊन लग्न करतील. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सार्वजनिक बहिष्कार टाकला जाईल.

अजब फर्मान! 'या' गावात चुकूनही करू नका प्रेम, लव्ह मॅरेजवर आणली बंदी; ३ कुटुंबावर बहिष्कार
रतलाम - कायद्यानुसार वयस्क मुलामुलींना त्यांच्या पसंतीने विवाह करण्याचा अधिकार आहे परंतु देशातील काही भागात आजही प्रेम विवाह करणाऱ्या युवक आणि युवतीच्या कुटुंबाला सामाजिक बहिष्कार सहन करावा लागतो. आता मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील पंचेवा गावात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावात प्रेम विवाह करणाऱ्या युवक आणि युवतीच्या कुटुंबांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याची उघडपणे घोषणाच करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओही बनवण्यात आला आहे. जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ एका ठिकाणी बसलेले दिसतात. या गावकऱ्यांमध्ये एक युवक गावातील ठराव वाचून दाखवत असतो. ज्यात प्रेम विवाहाविरोधात हे फर्मान देण्यात आले आहे. या व्हिडिओतील युवक सांगतो, समस्त पंचेवा ग्रामस्थांकडून असा निर्णय घेण्यात आलाय की गावातील जो कुणी युवक अथवा युवती पळून जाऊन लग्न करतील. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सार्वजनिक बहिष्कार टाकला जाईल. या कुटुंबाला सामूहिक बहिष्कृत केले जाईल. त्यांना कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जाणार नाही असं त्याने सांगितले.
त्याशिवाय पळून जाणाऱ्या युवक आणि युवतीच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला मजुरीवर बोलवले जाणार नाही. जर एखाद्याने बहिष्कार टाकलेल्या कुटुंबातील कुणाला मजुरी करण्यासाठी बोलावले तर त्याच्यावरही गावकऱ्यांकडून बहिष्कार टाकला जाईल. इतकेच नाही तर प्रेम विवाह करणाऱ्यांच्या कुटुंबाला दूध अथवा अन्य साहित्य देण्यावरही निर्बंध आणले गेलेत. या कुटुंबाकडील शेती कुणीही भाड्याने घेणार नाही. त्यांच्या घरातील कुठल्याही कार्यक्रमाला गावातील लोक जाणार नाहीत. प्रेम विवाह करणाऱ्या व्यक्तींसोबत जो साक्षीदार बनेल त्याच्यावरही बहिष्काराची कारवाई केली जाईल असं या फर्मानमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, या व्हिडिओत प्रेम विवाह करणाऱ्या ३ कुटुंबाची नावेही घेण्यात आली. जर गावातील कुणी बहिष्कृत केलेल्या कुटुंबाला मदत केली तर त्यांच्यावरही सामूहिक बहिष्कार टाकला जाईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला. कायद्यानुसार प्रेम विवाह करणे गुन्हा नाही. तरीही गाव पातळीवर अशाप्रकारे फर्मान काढून सामजिक विचार आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.