बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:23 IST2025-09-04T15:23:04+5:302025-09-04T15:23:28+5:30
Bihar Assembly Election News: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या जेडीयू आणि भाजपाने एनडीएतील मित्रपक्षांसह मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र एनडीएमधील छोटे मित्र पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टी-रामविलास, हम आणि आरएलएम यांनी अधिकाधिक जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने भाजपा आणि जेडीयूची डोकेदुखी वाढली आहे.

बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी असलेल्या जेडीयू आणि भाजपाने एनडीएतील मित्रपक्षांसह मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र एनडीएमधील छोटे मित्र पक्ष असलेल्या लोकजनशक्ती पार्टी-रामविलास, हम आणि आरएलएम यांनी अधिकाधिक जागांवर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने भाजपा आणि जेडीयूची डोकेदुखी वाढली आहे. यादरम्यान, आम्ही जागावाटपाच्या वादापासून दूर आहोत आणि आमचा भाजपासोबतचा ताळमेळ नेहमीच भक्कम राहील, असे जेडीयूने स्पष्ट केले आहे.
जेडीयूचे ज्येष्ठ नेते के.सी. त्यागी यांनी सांगितले की, २००५ पासून आम्ही भाजपासोबत आहोत. तसेच आमचा ताळमेळ नेहमीच चंगला राहिला आहे. भाजपा आणि जेडीयूमध्ये जागावाटपाबाबत कुठलाही वाद नाही आहे. एलजेपी, हम आणि आरएलएम यांच्यासोबत जागांचा ताळमेळ घालणं हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. जेडीयूला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मात्र एनडीए अत्यंत मजबुतीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बिहारसाठी एनडीएमध्ये अद्याप जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा १०२ ते १०३ आणि जेडीयू १०१ ते १०२ जागांवर लढू शकतात. उर्वरित जागांचे चिराग पासवान, जितनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षांसोबत वाटप होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात आम्हाला आघाडी होती ज्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी जेडीयूकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, चिराग पासवान यांच्या एलजेपी-रामविलास पक्षाने ४० जागांची मागणी केली आहे. मात्र त्यांना २० ते २५ जागा मिळू शकतात. तर जितनराम मांझी यांनी २० जागांची मागणी केली आहे. पण त्यांना ५ ते ६ जागा मिळू शकतात. तर उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षालाही ४ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.