ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:52 IST2025-06-27T16:51:14+5:302025-06-27T16:52:44+5:30
Indian Navy On Operation Sindoor: पाकिस्तानातील काही विशिष्ट ठिकाण्यांवर हल्ला करण्यास नौदलाला सांगितले गेले होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानवर तगडा प्रहार केला. हवाई दलाच्या साथीला सैन्य दलही उतरले होते. एवढेच नाही तर नौदलानेही पाकिस्तानातील पाण्यात आणि जमिनीवर देखील टार्गेट लॉक केले होते. नौदलाने वार केला असता तर हवेत सुरु असलेल्या या युद्धाचा मोठा भडका उडाला असता,नौदल आदेशाची वाट पाहत राहिले, परंतू आदेश न आल्याने नौदलाने पाकिस्तानवर हल्ला केला नसल्याचे समोर येत आहे.
भारताने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले होते. पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. यामुळे पाकिस्तानने भारताला प्रत्यूत्तर म्हणून ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरु केले. एलओसीवर गोळीबार, उखळी तोफांचा मारा सुरुच होता. तिथे बीएसएफ चोख प्रत्तूत्तर देत होते. परंतू इकडे पाण्यात नौदलही पूर्णपणे तयार होते. पाकिस्तानची पाण्यातील आणि जमिनीवरील टार्गेट लॉक केली गेली होती. जर हा हल्ला झाला असता तर दोन्ही देशांमध्ये सैन्याचा तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असता.
पाकिस्तानातील काही विशिष्ट ठिकाण्यांवर हल्ला करण्यास नौदलाला सांगितले गेले होते. यामध्ये पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका, बंदरे होती. यामुळे नौदलाने मुंबई, गुजरातच्या समुद्रात विमानवाहू युद्धनौकेसह पाणबुड्या पाठविल्या होत्या. टॉर्पिडोंनी नेम धरला होता. युद्धनौकांवरील ब्रम्होस मिसाईल लोड करण्यात आली होती. डागण्याच्या तयारीत नौदल समुद्रात आदेशाची वाट पाहत होते. आयएनएस विक्रांतवर मिग २९ के लढाऊ विमानांवर मिसाईल लोड करण्यात आली होती. विमानांनी उड्डाण करून पाकिस्तानच्या दक्षिणी समुद्र किनाऱ्यावरील आकाशात पूर्ण नियंत्रण मिळविले होते. भारताने घेरल्याचे पाकिस्तानच्या लक्षात आले होते. पाकिस्तानच्या युद्धनौका बंदरातच नांगरलेल्या होत्या. अशा स्थितीत पर्ल हार्बरसारखा मोठा हल्ला भारताला करता आला असता. परंतू, यामुळे मोठ्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता होती.
पाकिस्तानी नौदलाचे आरएएस-७२ सी ईगल विमान हवेत झेपावले होते. भारताच्या विमानांसह युद्धनौकांच्या हालचाली टिपण्यासाठी हे विमान पाकिस्तानने पाठविले होते. आयएनएस विक्रांतने या विमानावरही निशाना धरला होता. मिग-२९के ने त्याचा पाठलाग केला आणि माघारी धाडले होते.