आयसीयू बनला मृत्यूचा सापळा; मदतीसाठी ओरडत होते रुग्ण, पण... कशी लागली कटक मेडिकल कॉलेजमध्ये आग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:23 IST2026-03-16T10:22:12+5:302026-03-16T10:23:22+5:30
ओडिशामधील कटक येथील प्रसिद्ध एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागली.

आयसीयू बनला मृत्यूचा सापळा; मदतीसाठी ओरडत होते रुग्ण, पण... कशी लागली कटक मेडिकल कॉलेजमध्ये आग?
ओडिशामधील कटक येथील प्रसिद्ध एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ट्रॉमा केअर आयसीयूला लागलेल्या भीषण आगीत १० गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण ओडिशासह देश हळहळला असून, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नेमकं काय घडलं? पहाटेचा तो थरार...
सोमवारी पहाटे जेव्हा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत होते, तेव्हा अचानक ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये धूर निघू लागला. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण आयसीयू धुराच्या विळख्यात सापडला. त्यावेळी तिथे एकूण २३ रुग्ण दाखल होते. धुरामुळे श्वास गुदमरल्याने ७ रुग्णांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर रुग्णांना तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आणखी तिघांनी जीव सोडला.
कर्मचाऱ्यांचे धाडस, पण निसर्गाचा कोप
आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांना वाचवण्यासाठी धाव घेतली. रुग्णांना सुरक्षित बाहेर काढताना अनेक कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळातून हळहळ आणि संताप
"ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी दिले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. राज्यपाल हरि बाबू कम्भमपति यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कटकचे एससीबी मेडिकल कॉलेज हे राज्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे, जिथे दररोज हजारो रुग्ण येतात. अशा प्रतिष्ठित रुग्णालयात आग लागल्याने रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रशासन आता कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.