भारताजवळ किती दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा, इराण-इस्रायल युद्ध वाढलं तर काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:17 IST2026-03-03T15:16:29+5:302026-03-03T15:17:57+5:30
Hormuz Strait india oil imports: इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध छेडले आहे. हा लष्करी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे असून, त्याचा फटका भारताला बसणार आहे. त्याचे कारण म्हणजे इराणने होर्मुझ स्ट्रेट बंद करण्याची केलेली घोषणा.

भारताजवळ किती दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा, इराण-इस्रायल युद्ध वाढलं तर काय?
इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात सुरू केलेले युद्ध लांबणार असल्याचेच दिसू लागले आहे. अमेरिका-इस्रायलनेइराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचीच हत्या केल्याने हा संघर्ष चिघळला आहे. कारण इराणकडून इस्रायल आणि अमेरिकेविरोधातील हल्ले वाढले आहेत. त्यातच इराणने कच्चे तेल आणि गॅस (नैसर्गिक वायू) व्यापाराचाच मार्ग बंद करण्याची घोषणा केली आहे. भारत याच मार्गाने इराणसह आखाती देशातून आयात करतो.
होर्मुझ स्ट्रेट मार्गाने भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. यात इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवैत या देशातून भारत कच्चे तेल आणि गॅस यांची आयात करतो. जानेवारीमध्ये भारताने एकूण आयातीपैकी ५५ टक्के तेल मध्य पूर्वेतील देशातील आयात केले होते.
भारताकडील तेल साठा किती?
इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्ट्नुसार, भारताने युद्धजन्य परिस्थिती किंवा जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी भुयारी गोदामांमध्ये तेल साठा करून ठेवला आहे. भारताचे तेल साठे तीन शहरांमध्ये आहे. विशाखापट्टनम, मँगलोर, पादुर इथे हे तेल साठे आहेत. त्यात जवळपास ५.३३ मिलियन मेट्रिक टन कच्चे तेल साठवण्याची क्षमता आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी फेब्रुवारीमध्ये बोलताना सांगितले होते की, भारताने वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेले एकूण तेल एकत्र केले, तर ७४ दिवस पुरेल इतके तेल उपलब्ध आहे.
दररोज १.५ कोटी बॅरलची वाहतूक
तज्ज्ञांच्या मते होर्मुझ स्ट्रेट या सागरी खाडीतून दररोज १.५ कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. काही सागरी खाड्यांमधून पाईपलाईननेही तेलाची वाहतूक केली जाते. पण, होर्मुझ स्ट्रेट बंद केल्यास तब्बल १ कोटी बॅरल तेल वाहतुकीला फटका बसणार आहे.
भारतासाठी फटका का?
भारत आयात करत असलेल्या एकूण कच्च्या तेलापैकी दररोज ५० टक्के तेल म्हणजे २५ ते २७ बॅरल होर्मुझ स्ट्रेट मार्गाने आयात करतो. इराक, सौदी अरेबिया, युएई, कुवैत या देशांकडून भारत मुख्यत्वे तेल आयात करतो. तेलाशिवाय घरगुती वापरासाठीचा एलपीजी गॅस, एलएनजी याच मार्गाने आयात केला जातो.
तज्ज्ञांच्या मते भारतासाठी कच्चे तेलाच्या तुलनेत नैसर्गिक वायू पुरवठ्याचे संकट निर्माण होऊ शकते. भारत एकूण गरजेच्या ८० ते ८५ टक्के एलपीजी गॅस आयात करतो. त्यात जास्त गॅसची आयात आखाती देशातील होर्मुझ स्ट्रेट मार्गानेच होते. नैसर्गिक वायू साठवून ठेवण्यासाठी भारताकडे इतक्या मोठ्या क्षमतेचे गोदाम नाहीत.