देशासाठी केलेले काम पक्षविरोधी कसे? काँग्रेस नेते शशी थरूर यांचा आपल्याच पक्षाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:29 IST2025-06-06T13:28:17+5:302025-06-06T13:29:02+5:30
देशसेवा करणाऱ्या माणसाने बाकीच्या गोष्टींबद्दल फार चिंता करायची नसते!

देशासाठी केलेले काम पक्षविरोधी कसे? काँग्रेस नेते शशी थरूर यांचा आपल्याच पक्षाला टोला
वॉशिंग्टन: देशहितासाठी काम करणे जर कोणाला पक्षविरोधी वाटत असेल, तर त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा, असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी स्पष्ट केले. मी काँग्रेस पक्षाचा त्याग करणार अशी सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, देशसेवा करणाऱ्या माणसाने बाकीच्या गोष्टींबद्दल फार चिंता करायची नसते.
पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूर या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताची दहशतवादविरोधी भूमिका मांडण्यासाठी शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे थरूर यांनी समर्थन केल्यावर काही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. भाजपचे सुपरप्रवक्ते असेही एका काँग्रेस नेत्याने थरूर यांना म्हटले आहे. भाजपमध्ये जाणार का? काँग्रेस सोडणार का? याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबद्दल ते म्हणाले की, मी निवडून आलेला खासदार असून, माझा कार्यकाळ संपण्यास अजून चार वर्षं बाकी आहेत. तरीही असा प्रश्न का विचारला जातो हे मला उमजत नाही.
भारत-पाक संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माघार घेतल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. त्याबाबतच्या प्रश्नावर थरूर म्हणाले की, मला त्याबाबत काहीही बोलायचे नाही.
थरूर यांना मुलानेच विचारला प्रश्न
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केवळ खात्रीशीर पुराव्याअंतीच केले आहे, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले. थरूर यांना त्यांच्या पत्रकार मुलाने इशान थरूरने (वॉशिंग्टन पोस्टसाठी) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले. म्हणाले, "भारत असा देश नाही जो ठोस आधार नसताना लष्करी कारवाई करेल. पहलगाम हा काही अचानक केलेला दहशतवादी हल्ला नव्हता."