माणुसकी अजूनही जिवंत! भंगार विक्रेत्याने परत केले १५ लाखांचे सोने; दिवाळीच्या साफसफाईत चुकून दिले होते फेकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:10 IST2026-02-20T13:07:46+5:302026-02-20T13:10:03+5:30
हरियाणामध्ये एका भंगार विक्रेत्याने माणुसकीचे दर्शन घडवत एका व्यक्तीला त्याचे सोने परत केले.

माणुसकी अजूनही जिवंत! भंगार विक्रेत्याने परत केले १५ लाखांचे सोने; दिवाळीच्या साफसफाईत चुकून दिले होते फेकून
लोकांमध्ये आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय देणारी एक थक्क करणारी घटना फरिदाबादमध्ये उघडकीस आली आहे. एका भंगार विक्रेत्याने आपल्या दुकानात सापडलेले तब्बल १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्या खऱ्या मालकाला परत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं प्रकरण काय?
बल्लभगढमधील रहिवासी अशोक शर्मा यांच्या घरी ही घटना घडली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी शर्मा कुटुंबीयांनी चोरीच्या भीतीने घरातील १०० ग्रॅम सोन्याचे दागिने एका डब्यात भरले आणि तो डबा एका पोत्यात लपवून ठेवला होता. मात्र, दिवाळीच्या दरम्यान घराची साफसफाई करताना, घरातील जुन्या सामानासोबत ते पोते भंगार समजून चुकून विकले गेले.
काही दिवसांनी दागिने गायब असल्याचे लक्षात येताच शर्मा कुटुंबीयांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने भंगार विक्रेत्याकडे धाव घेतली, मात्र त्यावेळी ते दागिने तिथे सापडले नाहीत. आपले १५ लाखांचे सोने कायमचे गेले, या विचाराने शर्मा कुटुंब पूर्णपणे हताश झाले होते.
चार महिन्यांनी फिरले नशिबाचे चक्र
हा सर्व प्रकार होऊन चार महिने उलटले होते. दरम्यान, भंगार विक्रेते हाजी अख्तर खान हे त्यांच्याकडील जमा झालेले भंगार वेगळे करत असताना, त्यांना एका कागदात गुंडाळलेले सोन्याचे दागिने सापडले. एवढ्या मोठ्या रकमेचे सोने पाहून खान यांनीही आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी तातडीने याबद्दल पोलिसांशी संपर्क साधला. बल्लभगढचे सहाय्यक पोलिस आयुक्त जितेश मल्होत्रा यांच्या कार्यालयात हाजी अख्तर खान यांनी हे सर्व दागिने प्रामाणिकपणे सुपूर्द केले. त्यानंतर पोलिसांनी मूळ मालक अशोक शर्मा यांना बोलवून त्यांचे दागिने त्यांच्या स्वाधीन केले.
काय म्हणाले हाजी अख्तर खान?
आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना खान म्हणाले, "जेव्हा मला ते सोने सापडले, तेव्हा ते त्याच्या खऱ्या मालकापर्यंत पोहोचवणे हे माझे कर्तव्य असल्याचे मला वाटले. माझ्या संपूर्ण कुटुंबाने या निर्णयाला पाठिंबा दिला. कोणाचे तरी हक्काचे धन माझ्याकडे राहणे मला मान्य नव्हते."
पोलिसांकडून कौतुक
जितेश मल्होत्रा यांनी खान यांच्या या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, "आजच्या काळातही प्रामाणिकपणा जिवंत आहे, हे या घटनेने सिद्ध केले. मात्र, नागरिकांनीही आपल्या मौल्यवान वस्तू हाताळताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे." आपले दागिने परत मिळाल्यावर अशोक शर्मा यांनी आनंद व्यक्त करत हाजी अख्तर खान आणि पोलिसांचे आभार मानले. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, हाजी अख्तर खान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.