इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:13 IST2025-06-13T15:12:06+5:302025-06-13T15:13:48+5:30

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. याच तणावाचे रूपांतर शुक्रवारी हल्ल्यात झाले.

'High alert' in Kashmir due to Iran-Israel conflict, what is the reason behind India's concern? | इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?

इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण आहेत. याच तणावाचे रूपांतर शुक्रवारी हल्ल्यात झाले. इस्रायलनेइराणवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणच्या अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजले आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. दुसरीकडे, इस्रायलमध्येही तात्काळ आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि दोन्ही देशांनी आपली हवाई हद्द बंद केली.

काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली!
इराण आणि इस्रायलमधील या वाढत्या संघर्षामुळे जम्मू-काश्मीरच्या काही भागांत, विशेषतः शियाबहुल भागांमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांना भीती आहे की, या तणावामुळे शुक्रवारी जुम्मा नमाजच्या वेळी शिया समुदायात तीव्र भावनिक प्रतिक्रिया उमटून निदर्शने किंवा हिंसाचार भडकू शकतो. त्यामुळे, काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिकच वाढवण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यामुळे आधीच तणाव
जम्मू-काश्मीरमध्ये आधीच तणावाची परिस्थिती आहे. २२ एप्रिल रोजी पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात भारतीय आणि परदेशी नागरिक होते. या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि हल्ल्याला मदत करणाऱ्यांनाही शोधून काढले होते. त्यामुळे, पहलगाम हल्ल्यापासूनच जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क आहेत.

भारताची काही विमाने रद्द, प्रवाशांना सतर्कतेचा इशारा!
इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे, सुरक्षिततेचा विचार करून भारताने काही विमाने परत बोलावली आहेत. मात्र, दिल्ली विमानतळाने स्पष्ट केले आहे की, दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या विमानांवर फारसा परिणाम झालेला नाही; फक्त काही उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्ली विमानतळाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासासंबंधीच्या माहितीसाठी त्यांनी संबंधित विमान कंपनीशी थेट संपर्क साधावा आणि सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Web Title: 'High alert' in Kashmir due to Iran-Israel conflict, what is the reason behind India's concern?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.