CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 11:08 IST2021-05-07T11:05:32+5:302021-05-07T11:08:12+5:30

CoronaVirus: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

hemant soren criticised pm modi over corona situation | CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

ठळक मुद्देहेमंत सोरेन यांची पंतप्रधान मोदींवर टीकापंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाहीपंतप्रधान मोदींची फोन पे चर्चा

रांची: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करतायत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याबाबत काय उपाययोजना करता येतील, याबाबतही मते, सूचना, सल्ला यांचे आदान-प्रदान केले जाते. मात्र, आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. (hemant soren criticised pm modi over corona situation) 

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यासंदर्भात माहिती दिली. मात्र, यावेळी त्यांनी मोदींना खोचक टोला लगावला. आदरणीय पंतप्रधानांसोबत फोनवरून चर्चा झाली. पंतप्रधानांनी केवळ मन की बात केली. पंतप्रधानांनी काम की बात केली असती आणि ऐकली असती, तर फार चांगले झाले असते, असा खोचक टीका हेमंत सोरेन यांनी केली आहे. 

पंतप्रधान मोदींची फोन पे चर्चा

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. यामध्ये झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण यासह अनेक राज्यांचा समावेश होता. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही यापूर्वी पंतप्रधान मोदींवर यासंदर्भात टीका केली होती. पंतप्रधानांसोबतची चर्चा केवळ वन-वे असते. आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही, अशी टीका बघेल यांनी केली होती. 

...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

केंद्र मदत करत नाही

केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत केली जात नाही, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. केंद्राकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. मात्र, केवळ २ हजार १८१ इंजेक्शन देण्यात आली, असा दावा यावेळी करण्यात आला. बांगलादेशमधून रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करण्याची परवनागी मागितली होती. परंतु, त्यावरही अद्याप काहीच उत्तर आले नाही, असेही सोरेन यांनी सांगितले. 

लसीकरण कार्यक्रमाबद्दल अत्यंत असमाधानी: टास्क फोर्सच्या प्रमुखांचे स्पष्ट मत

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद करण्यात आली आहे.  आतापर्यंत २ लाख ३४ हजार ८३ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
 

Web Title: hemant soren criticised pm modi over corona situation