"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:47 IST2025-06-14T16:45:36+5:302025-06-14T16:47:31+5:30
अहमदाबाद अपघातानंतर तिथे कशी परिस्थिती होती याची माहिती एका मदत करणाऱ्या व्यक्तीने दिली.

"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताच्या धक्क्यातून लोक अद्यापही सावरलेले नाहीत. अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही सेकंदांमध्येच कोसळलं आणि हाहाकार उडाला. आतापर्यंत २७५ लोक या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. यातील २४१ हे विमानातील प्रवासीच होते. विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याचे स्फोटाची व्याप्ती जास्त होती. हा स्फोट इतका मोठा होता की सर्वच प्रवासी त्यात होरपळून निघाले. यासोबत आजूबाजूच्या परिसराचेही मोठं नुकसान झालं. या दुर्घटनेनंतर सर्वात आधी स्थानिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. यावेळी लोकांनी प्रवाशांच्या शरीराचे अवयव मिळेल त्या गोष्टींमधून एकत्र करण्यास सुरुवात केली होती.
अहमदाबादमध्ये विमान कोसळून दोन दिवस पूर्ण झाले आहेत. आता विमानाचा ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने बचाव पथकात सहभागी असलेल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. मेघाणी नगरमध्ये पसरलेल्या ढिगाऱ्यातून लोकांचे सामान उचलणे हा एक अतिशय वेदनादायक अनुभव ठरत आहे. एक स्थानिक व्यक्ती जेवणासाठी घरी परतत होती. मात्र अपघातस्थळावरील दृष्य पाहून त्याने मृतदेह आणि ढिगारा गोळा करण्यास मदत करण्यास सुरुवात केली. आता घटनास्थळावरून सामान काढण्याचे काम सुरू आहे. सैनिक आणि तज्ञांव्यतिरिक्त स्थानिक लोक स्वयंसेवक म्हणून या कामात मदत करत आहेत.
५६ वर्षीय राजेश पटेल हे या भागातील रहिवासी आहेत. ते रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणून काम करतात. जेव्हा ही घटना घडली तेव्हा राजेश पटेल जेवणासाठी घरी येत होते. पण घरी पोहोचण्याऐवजी ते पुढील सात तास घटनास्थळी मदत करत राहिले. "हा स्फोट इतका भयानक होता की कोणीही घटनास्थळी लवकर पोहोचू शकले नाही. घटनास्थळी परिस्थिती खूपच वाईट होती. मृतांचे शरीराचे अवयव सर्वत्र विखुरलेले होते. आम्ही बॅग आणि कपड्यांमध्ये मृतदेहांचे अवयव उचलण्यास सुरुवात केली. नंतर आम्ही साड्या वापरल्या. रात्री ९ वाजेपर्यंत बचावकार्य सुरू राहिले. या काळात मी स्वतः सुमारे ५० मृतदेह गोळा केले," असं राजेश पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांव्यतिरिक्त, अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातस्थळी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकची एक टीम तैनात करण्यात आली आहे. एनएसजी टीम मदत कार्यात इतर यंत्रणांना मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. गुरुवारी दुपारी लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही वेळातच मेघनानगर परिसरातील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. या अपघातात सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला.