मोठा अनर्थ टळला! उत्तर प्रदेशात हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग; उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:14 IST2026-03-07T12:14:44+5:302026-03-07T12:14:59+5:30
उपमुख्यमंत्री लखनौच्या ला मार्ट्स मैदानातून कौशांबी जाण्यासाठी रवाना झाले होते. उड्डाण भरल्यानंतर काही मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये अचानक धूर पसरला

मोठा अनर्थ टळला! उत्तर प्रदेशात हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग; उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
लखनौ - उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. लखनौच्या कौशांबी येथून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे राजधानीच्या अमौसी एअरपोर्टवर हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग करावी लागली.
माहितीनुसार, उपमुख्यमंत्री लखनौच्या ला मार्ट्स मैदानातून कौशांबी जाण्यासाठी रवाना झाले होते. उड्डाण भरल्यानंतर काही मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये अचानक धूर पसरला आणि डिस्प्लेही बंद पडला. ज्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणारे लोक घाबरले. पायलटने परिस्थिती गांभीर्य ओळखत प्रसंगावधान राखले आणि तातडीने लखनौच्या एटीसीशी संपर्क साधला. अमौसी एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागण्यात आली. या लँडिंगवेळी एअरपोर्टवर सुरक्षेच्या दृष्टीने इतर सोयीसुविधा तैनात करण्यात आल्या.
जसे हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले, सुरक्षा आणि तांत्रिक टीमने या हेलिकॉप्टरची तपासणी केली. या घटनेतून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
केशव प्रसाद मौर्य लखनौहून कौशांबीकडे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. परंतु तांत्रिक बिघाड आणि कॅबिनमध्ये पसरलेल्या धूरामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेने प्रशासनातही खळबळ माजली. सुदैवाने हेलिकॉप्टरमध्ये बसलेले सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू
२८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील मुंबईहून बारामतीसाठी खासगी विमानाने जात होते. सकाळच्या सुमारास बारामती येथे या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली. बारामती रनवेजवळ ५० मीटर अंतरावर हे विमान खाली कोसळले होते. या अपघातात विमानाला आग लागली त्याशिवाय काही स्फोटही झाल्याचे स्थानिकांनी सांगितले होते.