"हो, मी एपस्टिनला भेटलो, पण...; राहुल गांधींच्या आरोपांवर हरदीप पुरींचा संसदेबाहेर मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:14 IST2026-02-11T18:14:25+5:302026-02-11T18:14:46+5:30
Hardeep Singh Puri on Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या एपस्टीन फाइल्स आणि व्यापारी कराराच्या ...

"हो, मी एपस्टिनला भेटलो, पण...; राहुल गांधींच्या आरोपांवर हरदीप पुरींचा संसदेबाहेर मोठा खुलासा
Hardeep Singh Puri on Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या एपस्टीन फाइल्स आणि व्यापारी कराराच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींना बिनबुडाचे आरोप करण्याची जुनी सवय असून त्यांच्या विधानांमध्ये केवळ मनोरंजन मूल्य असते, अशी घणाघाती टीका पुरी यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच शांतता शिष्टमंडळात एपस्टाईनला ३-४ वेळा भेटलो असल्याची माहिती हरदीप पुरी यांनी दिली.
"राहुल गांधींच्या आरोपांत तथ्य नाही"
हरदीप सिंह पुरी यांनी राहुल गांधींच्या टीकेचा समाचार घेताना म्हटले की, "एक युवा नेता संसदेत काहीतरी बोलतो आणि निघून जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणण्यापूर्वी त्यांनी डिक्शनरी किंवा कॉमन सेन्स वापरला पाहिजे. भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. राहुल गांधींचे वर्तन हे हास्यास्पद आहे."
"मी तथ्ये पाठवली होती, तरीही खोटे बोलले"
राहुल गांधींनी संसदेत हरदीप पुरींचे नाव जेफरी एपस्टीन प्रकरणाशी जोडल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना पुरी म्हणाले की, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाच्या कार्यक्रमात राहुल गांधींनी मला डोळा मारत सांगितले होते की, तुमचे नाव एका रंजक ठिकाणी आले आहे. मी त्यांना तेव्हाच विचारले की तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे का? त्यानंतर मी त्यांना सविस्तर नोट्स आणि माहिती पाठवली होती. तरीही त्यांनी संसदेत चुकीचे संदर्भ देऊन माझे नाव घेतले."
ती भेट नेमकी काय होती?
२००९ मध्ये न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत असताना इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून एपस्टीनशी भेट झाली होती. ही माहिती आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. मी तेव्हा सरकारी अधिकारी नव्हतो तर एका स्वतंत्र संस्थेचा भाग होतो, असे हरदीप पुरी यांनी सांगितले.
राहुल गांधींवर निशाणा साधताना पुरी यांनी त्यांच्या जुन्या कृतींचा उल्लेख केला. "हे तेच नेते आहेत ज्यांनी २०१३ मध्ये स्वतःच्याच सरकारचा अध्यादेश सार्वजनिकपणे फाडला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ब्राझीलच्या मॉडेलबद्दल चुकीचे विधान केले होते. ते केवळ संविधानाची प्रत हवेत फडकवतात, पण त्यातील गांभीर्य त्यांना समजत नाही," असेही पुरी म्हणाले.
व्यापारी करारावर उत्तर
भारताने आंतरराष्ट्रीय दबावाखाली व्यापारी करार केल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवरही पुरी यांनी प्रत्युत्तर दिले. "भारताच्या जीडीपीचा ५० टक्के भाग हा बाह्य क्षेत्राशी जोडलेला आहे. भारताने कमीत कमी वेळेत ९ व्यापारी करार यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. काहीतरी वाचून-लिहून बोलले पाहिजे," असा सल्लाही त्यांनी राहुल गांधींना दिला.