एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू, विरह सहन न झाल्याने पालकांची आत्महत्या, घराच्या अंगणातच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:32 IST2026-02-17T14:31:27+5:302026-02-17T14:32:50+5:30
Chhattisgarh News: एका रस्ते अपघातात आपल्या २१ वर्षीय एकुलत्या एका मुलाला गमावल्यानंतर त्याच्या विरहात आई-वडिलांनीही आपली जीवनयात्रा संपवली.

एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू, विरह सहन न झाल्याने पालकांची आत्महत्या, घराच्या अंगणातच...
एकुलत्या एका मुलाच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने एका हतबल माता-पित्याने आपल्या घराच्या अंगणातच गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जांजगीर-चंपा जिल्ह्यातील धारदेई गावातील या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कृष्णा पटेल (४८ वर्षे) आणि त्यांची पत्नी रमाबाई पटेल (४७ वर्षे) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पटेल यांच्या घरातून बराच वेळ कोणतीही हालचाल होत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहिले असता, या दाम्पत्याने घराच्या अंगणात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले?
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातील मजकूर वाचताना उपस्थितांचे डोळे पाणावले. "आमचा मुलगा आदित्य आमचे सर्वस्व होते. ज्या दिवशी त्याचा अपघात झाला, त्या दिवशी आम्हीच त्याला मंदिरातील पुजाऱ्यांच्या मदतीसाठी पाठवले होते. त्याला त्या कामाला पाठवणे ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. त्याच्याशिवाय आमचे जगणे आता अशक्य झाले असून जीवन पूर्णपणे रिकामे वाटत आहे."
पोलीस तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये मास्तुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पटेल दाम्पत्याचा २१ वर्षीय मुलगा आदित्य पटेल याचा मृत्यू झाला. आदित्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनानंतर हे दाम्पत्य प्रचंड मानसिक धक्क्यात होते. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.