“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:34 IST2025-11-27T16:33:42+5:302025-11-27T16:34:11+5:30
Election Commission Of India SIR: अशा सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर खटला चालवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
Election Commission Of India SIR: केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांशी संबंधित विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. मतदार यादी पुनरीक्षण (SIR), पश्चिम बंगालमधील बीएलओंचा मृत्यू, तसेच केरळ आणि तामिळनाडूतील प्रकरणांवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान देशभरातून बीएलओंच्या मृत्यूंच्या तक्रारी समोर आल्या आहेत. एकट्या पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत २३ बीएलओंचा मृत्यू झाल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. यातच संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका संघटनेने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले असून, एसआयआरमुळे मृत्यू झालेल्यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अखिल भारतीय शैक्षणिक महासंघ महासचिव गीता भट्ट यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. एसआयआर हा देशाच्या लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग आहे. निष्पक्ष निवडणुकांसाठी मतदार याद्यांची अचूकता आवश्यक आहे. परंतु, असे असले तरी शिक्षक समुदायाने नेहमीच ही भूमिका सचोटीने पार पाडली आहे. बीएलओना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान बीएलओमध्ये नैराश्य, तणाव आणि आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. बीएलओना दिवसाचे १६ ते १८ तास काम करावे लागत आहे. त्यांना तांत्रिक सुविधा योग्य पद्धतीने मिळत नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.
अधिकाऱ्यांमुळे शिक्षकांवर मानसिक ताण
अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे, बीएलओ कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांना मानसिक ताण येत आहे. अनेक ठिकाणी जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. हे केवळ शिक्षक समुदायासाठी त्रासदायक नाही तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. बीएलओ अॅप आणि पोर्टल वारंवार बिघडणे, नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा अभाव, ओटीपी आणि डेटा अपलोड अयशस्वी होणे, तांत्रिक प्रशिक्षणाचा अभाव यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे बीएलओना अनेकदा स्वतःच्या संसाधनांवर अवलंबून राहावे लागते. २० वर्षांपूर्वीची कागदपत्रे लोकांकडे नसल्यामुळे बीएलओंना अनेकदा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो. ते त्यांच्याशी गैरवर्तन करतात. निवडणूक आयोगाने एसआयआरचे महत्त्व जनतेला पुरेसे सांगितलेले नाही आणि लोकांना ही प्रक्रिया अनेकदा अनावश्यक वाटते, असेही या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, एसआयआरच्या दबावामुळे मृत्युमुखी पडलेल्या किंवा जीवन संपवले आहे, अशांना १ कोटी रुपयांची भरपाई आणि सरकारी नोकरी देण्यात यावी. अशा सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर खटला चालवावा. बीएलओंना तांत्रिक सहाय्यक, संगणक ऑपरेटर किंवा सहाय्यक, टॅब्लेट/लॅपटॉप व्यतिरिक्त प्रवास भत्ता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.