कुरूक्षेत्रातून जगभर गुंजणार गीतेचा संदेश, संत मोरारीबापूंच्या रामकथेने प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:51 IST2022-11-22T12:49:28+5:302022-11-22T12:51:48+5:30
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते.

कुरूक्षेत्रातून जगभर गुंजणार गीतेचा संदेश, संत मोरारीबापूंच्या रामकथेने प्रारंभ
चंडीगड : हरयाणातील कुरूक्षेत्र या पवित्र भूमीतून गीतेचा संदेश जगभर घुमणार आहे. हा संदेश भारताची आध्यात्मिक संस्कृती दर्शवेल. कुरूक्षेत्रातील सर्व तीर्थक्षेत्रे श्रीकृष्ण सर्किट म्हणून विकसित केली जातील. संत मोरारीबापूंनी सुरू केलेल्या रामकथेतून देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कुरूक्षेत्र लवकरच एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणूनही उदयास येणार आहे. आंतरराष्ट्रीय गीता जयंती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ही माहिती देण्यात आली.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही उपस्थित होते. रामकथेचे उद्घाटन करताना संत मोरारीबापू म्हणाले की, ही कथा संपूर्ण समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देईल. यावेळी गीता ज्ञान संस्थेतर्फे मेळ्यात नऊ दिवस रामकथेचे पठण होणार आहे. रामकथेतून जीवन जगण्याचा संदेश जनतेला दिला जाणार असल्याचे संत मोरारी बापू म्हणाले. ऋषी-मुनींच्या या भूमीतून हा संदेश हजारो वर्षांपासून जगभर पोहोचत आहे. हा संदेश लोकांना भारताची आध्यात्मिक संस्कृती दर्शवत आहे.
कुरूक्षेत्रला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ करणार
मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, हरयाणा सरकार कुरूक्षेत्रला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. या पवित्र भूमीतील सर्व तीर्थक्षेत्रे श्रीकृष्ण सर्किट म्हणून विकसित केली जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कुरूक्षेत्राच्या भूमीच्या प्रत्येक कणात इतिहास आहे, त्यामुळे ते जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.