"मी आजारी नव्हतो, पण...!"; माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनाम्यावर मौन सोडलं, अखेर खरं कारण समोर आलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:45 IST2026-02-27T13:44:05+5:302026-02-27T13:45:08+5:30
धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपतींकडे सुपुर्द केलेल्या आपल्या राजीनाम्यात काय म्हटलं होतं...?

"मी आजारी नव्हतो, पण...!"; माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनाम्यावर मौन सोडलं, अखेर खरं कारण समोर आलं
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी त्या संदर्भात मोठे विधान केले आहे. "आपला राजीनामा राजीनामा खराब प्रकृतीमुळे नव्हता, तर 'प्रकृतीला प्राधान्य' देण्यासाठी हा निर्णय घेतला होता," असे खुद्द धनखड यांनीच स्पष्ट केले आहे. ते राजस्थानमधील चूरू येथे एका जनसभेला संबोधित करत होते.
राजीनाम्यासंदर्भात नेमकं काय म्हणाले धनखड? -
धनखड म्हणाले, "असे म्हटले जाते की, पहिले सुख निरोगी काया. मी आरोग्याप्रति नेहमीच जागरुक असतो. पद सोडताना मी आजारी असल्याचे कधीही म्हटले नाही, तर आरोग्याला महत्त्व देत असल्याचे म्हटले होते." धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपतींकडे सुपुर्द केलेल्या आपल्या राजीनाम्यातही "आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी"
आपण पद सोडत असल्याचे म्हटले होते.
राहुल गांधींचे उपस्थित केले होते प्रश्न -
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धनखड यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्नांची सरबत्ती केली होती. "त्यांनी राजीनामा का दिला आणि ते गप्प का आहेत, यामागे एक मोठी कथा आहे. राज्यसभेत गरजणारा माणूस अचानक शांत का झाला?" असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले होते.
धनखर यांच्या चुरू दौऱ्याचे आयोजन माजी काँग्रेस खासदार राम सिंह कासवान आणि ऑलिंपियन आणि माजी काँग्रेस आमदार कृष्णा पूनिया यांनी केले होते. राम सिंह कासवान हे चुरुचे सध्याचे काँग्रेस खासदार राहुल कासवान यांचे वडील आहेत.