पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:58 IST2025-08-27T13:56:43+5:302025-08-27T13:58:26+5:30

जवाहर नवोदय विद्यालयाला अचानक आलेल्या पुराचा तडाखा बसला. संपूर्ण कॅम्पस पाण्याखाली गेला आणि तळमजल्यावरील वर्गखोल्या मोठ्या प्रमाणात पाण्याने भरल्या.

Floods wreak havoc in Punjab, 400 children and school staff trapped in Navodaya Vidyalaya; Parents angry with administration | पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले

पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधून येणाऱ्या नद्यांना पूर आल्याने पंजाबच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यात एका जवाहर नवोदय विद्यालयाला याचा फटका बसला. संपूर्ण कॅम्पस पाण्याखाली गेला आणि तळमजल्यावरील वर्गखोल्या मोठ्या प्रमाणात पाण्याने भरल्या आहेत. हे नवोदय विद्यालय गुरुदासपूरपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. शाळेत ४०० विद्यार्थी आणि सुमारे ४० कर्मचारी अडकले आहेत.

ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली

ही शाळा गुरुदासपूर ते दोरंगळा या रस्त्यावर आहे. रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे आणि आजूबाजूचा परिसर पाण्याखाली गेला आहे. येथे पोहोचणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान दीनानगर विभागात जात असल्याने बचाव कार्यालाही विलंब होत आहे. गुरुदासपूर जिल्हा या विभागात येतो आणि सध्या अधिकारी त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. यामुळे बचाव कार्य सुरू करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. ही शाळा देखील दीनानगर उपविभागात येते.

जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारच्या निधीतून चालवली जाणारी सरकारी शाळा आहे. गुरुदासपूरचे उपायुक्त त्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. या प्रकरणात प्रशासनाचा हलगर्जीपणा पाहून मुलांच्या पालकांमध्येही संताप दिसून येत आहे. एका पालकाने सांगितले की, जेव्हा पुरामुळे परिस्थिती बिकट होत होती, तेव्हा मुलांना लवकर का पाठवले नाही. जिल्हा प्रशासनाला तीन दिवसांपासून माहित आहे की पूर येणार आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.  प्रशासनाने संपूर्ण गुरुदासपूर जिल्ह्यातील सर्व शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवल्या आहेत, तर मग मुलांना येथून घरी का पाठवले नाही, असा सवाल त्यांनी केला.

१९८८ मध्ये असाच पूर आला होता

 जवाहर नवोदय विद्यालय ही निवासी शाळा आहे, यामुळे मुलांना घरी पाठवण्यात आले नाही.  शाळेच्या शेजारी एक नाला वाहतो. तो नाला गेल्या काही महिन्यांपासून साफ केलेला नाही. त्यामुळे पाणी वस्त्यांकडे वाहत असल्याचा आरोप करण्यात आला.  १९८८ मध्ये पंजाबमध्येही मोठा पूर आला होता. तो वर्षीच्या पुरापेक्षा यावेळी मोठा पूर आला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Web Title: Floods wreak havoc in Punjab, 400 children and school staff trapped in Navodaya Vidyalaya; Parents angry with administration

टॅग्स :Punjabपंजाब