कौटुंबिक वादाचा भडका! पतीने गॅस सिलिंडर आणला नाही म्हणून पत्नीने प्यायले विष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:47 IST2026-03-31T12:46:09+5:302026-03-31T12:47:26+5:30
आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये पतीने ३ दिवस गॅस सिलिंडर न आणल्याने संतापलेल्या पत्नीने फिनाईल प्यायले.

कौटुंबिक वादाचा भडका! पतीने गॅस सिलिंडर आणला नाही म्हणून पत्नीने प्यायले विष
स्वयंपाकाच्या गॅससाठी रांगेत उभे राहूनही सिलिंडर न मिळाल्याने एका महिलेने रागाच्या भरात विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती मंडळातील तोंडपाडू गावात घडली आहे. सुदैवाने, या महिलेवर वेळेत उपचार सुरू झाल्याने तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, तोंडपाडू गावातील रहिवासी हरीकृष्ण हे गेल्या तीन दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी स्थानिक गॅस एजन्सीच्या वाऱ्या करत होते. मात्र, एजन्सीमध्ये गॅसचा तुटवडा असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत होते. गॅस पुरवठ्याला उशीर होत असल्याचे सांगून एजन्सी चालकांनी त्यांना वाट पाहण्यास सांगितले होते.
फिनाईल प्यायली आणि एकच खळबळ उडाली
घरातील गॅस संपल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून स्वयंपाकाचे हाल होत होते. पती वारंवार रिकाम्या हाताने घरी परतत असल्याने पत्नी महालक्ष्मी अत्यंत तणावात आणि रागात होती. पतीने पुन्हा एकदा "गॅस मिळाला नाही" असे सांगितल्यावर तिचा संयम सुटला. हतबलता आणि रागाच्या भरात तिने घरात असलेले फिनाईल प्यायले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली.
रुग्णालयात उपचार सुरू
महालक्ष्मीला तातडीने गुत्ती येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केल्याने तिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात गॅस एजन्सीच्या कारभारावर आणि गॅसच्या टंचाईवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोकांमध्ये चर्चेचा विषय
एका किरकोळ वाटणाऱ्या गॅस सिलिंडरच्या मुद्द्यावरून महिलेने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, गॅस बुकिंग करूनही वेळेवर डिलिव्हरी मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना अशाच समस्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक नोंद केली असून, हा प्रकार केवळ रागाच्या भरात घडल्याचे स्पष्ट केले आहे.